Wet Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावट

Team Agrowon

Pune News : राज्यातील ३५५ पैकी ३१७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. पुरेशी उघडीप न मिळाल्यास काही भागांत ओल्या दुष्काळाची समस्या उद्‌भवू शकते, असा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले, की चालू महिन्यात पुरेशी उघडीप अपेक्षित आहे. जुलैमध्ये पावसाने रजा घेतली नाही. ओलाव्यामुळे खरिपात सड, मूळकुज, वाढ खुंटणे अशा समस्या तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यात पुन्हा सप्टेंबरमध्ये मॉन्सून चांगला बरसण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे खरीप पिकांना चालू महिन्यात शाखीय वाढ, फूल व फळधारणेसाठी पुरेसा सूर्यप्रकाश, मोकळे वातावरण हवे आहे. यंदा खरिपाच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस होतो आहे. त्यामुळे पेरण्यादेखील वेळेत झालेल्या आहेत. परंतु, गेल्या पंधरवड्यापासून सतत पडणारा पाऊस व कमी सूर्यप्रकाश यामुळे काही भागात पीकवाढीला अडथळा ठरतो आहे.

राज्यात भात वगळता आता सर्वच पिकांना चालू महिन्यात उघडीप हवी आहे. उघडीप न मिळाल्यास शेतकऱ्यांना मशागतीची कामे करता येणार नाहीत. अर्थात, ही स्थिती राज्यात सर्वत्र नाही. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने देखील ओल्या दुष्काळाबाबत सध्यातरी काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.

“राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस जादा दिसतो आहे. परंतु अवर्षणग्रस्त भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. विदर्भ, मावळ, कोकणातील भात उत्पादक पट्ट्यात पाऊस भरपूर आहे. परंतु भात पीक जादा पावसाला सहनशील असते. त्यामुळे, तेथे सध्या तरी चिंतेचे कारण नाही. पुढील १०-१५ दिवसांची पावसाची स्थिती पाहून त्यानंतर ओल्या दुष्काळाबाबत बोलता येईल. तूर्त राज्यात चिंतेची स्थिती नाही,” असे राज्याच्या कृषी विस्तार विभागाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी सांगितले.

दरम्यान, सततच्या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात आंतरमशागतीच्या समस्या मात्र उद्‌भवल्या आहेत. निंदणी, खते देणे तसेच मशागतीची कामे खोळंबली आहेत. वेळेवर मशागत न झाल्यामुळे काही ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंतरमशागतीमधील अडथळे दूर न झाल्यास पिकाच्या उत्पादनावर किंचित परिणाम शक्य आहे, असे कृषी विभागाला वाटते.

थोडक्यात महत्त्वाचे...

बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरीहून जादा पाऊस

विदर्भ, मावळ, कोकणातील भात उत्पादक पट्ट्यात भरपूर पाऊस

चालू महिन्यात पुरेशी उघडीप अपेक्षित

जुलैमध्ये सातत्याने पाऊस

ओलाव्यामुळे खरिपात सड, मूळकुज, वाढ खुंटण्याची समस्या

सतत पडणारा पाऊस व कमी सूर्यप्रकाश यामुळे पीकवाढीला अडथळा

ओल्या दुष्काळाबाबत सध्यातरी चिंता नसल्याचे तज्ज्ञांचे मत

सोयाबीन पट्ट्यात उघडीप हवी

“मराठवाडा, विदर्भातील सोयाबीन उत्पादक पट्ट्यात गेल्या महिन्यात पाऊस सलग १५-२० दिवस ठाण मांडून होता. यातून फुलोऱ्यात समस्या उद्‌भवल्या. काही भागात ४०-५० टक्के पीक आताच वाया गेले आहे. आता पुरेशी उघडीप मिळाल्यास पिके जोम धरतील, अशी आम्हाला आशा वाटते,” असे राज्य बियाणे उत्पादक संघाचे अध्यक्ष अॅड. अमोल रणदिवे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT