Farmers Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipith Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा

sandeep Shirguppe

Shaktipeeth highway Kolhapur : गोवा ते नागपूर या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज (ता. १८) सकाळी ११.३० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चास खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजू बाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमरिष घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेते उपस्थित होते.

जमावबंदी आदेश लागू असतानाही काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले. हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले की, गोवा ते नागपूर असा ८०० किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग करणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. या महामार्गाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेत हा महामार्ग जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी मिळून याला विरोध करणे गरजेचे आहे. पर्यावरण, जैवविविधता, जलस्त्रोत, भूजल पातळी, नदी, विहिरी, कालवे पाण्याच्या पाईपलाईन, शेती या सर्व गोष्टी या महामार्गामुळे नष्ट होणार आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ``गोवा ते नागपूर या महामार्गासाठी ४० हजार एकर जमीन संपादित केली जाणार असून ८६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या महामार्गास बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. राज्यातील कोणत्याही नागरिकांनी समूहाने किंवा संघटनेने या महामार्गाची मागणी केलेली नव्हती. तरीदेखील शेतकऱ्यांची चर्चा न करताच हा प्रकल्प रेटला गेला आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आम्ही या विरोधात जोरदार आवाज उठवू.``

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट येत असल्याने रोज आत्महत्या होत आहेत. यावर उपाययोजना करण्याचे सोडून सरकार शेतकऱ्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेत आहे. आम्ही एक इंच देखील जमीन या मार्गासाठी देणार नाही. शासनाने हा महामार्ग तात्काळ रद्द करावा अन्यथा आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

आमदार प्रकाश आबिटकरांवर नाराजी

शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन दिले होते. दरम्यान हे निवेदन दिलेल्या दुसऱ्याच दिवशी सरकारने महामार्गाची अधिसूचना काढली. या अधिसूचनेच्या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

आज निघालेल्या मोर्चास आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपस्थिती लावणे आवश्यक असताना ते आले नसल्याने त्यांच्यावर महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हा महामार्ग करणाऱ्या सरकारमधील मंत्री आमच्या जमिनी काढून घेत असतील तर आमच्या जिल्ह्यात तुम्हाला फिरू देणार नाही असा इशारा गिरीष फोंडे यांनी दिला.

या मोर्चास गिरीश फोंडे, भारत पाटणकर, विजय देवणे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, महादेव धनवडे, प्रसाद खोबरे, प्रकाश पाटील, के डी पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, प्रिया बाणदार, पूजा मोरे, मच्छिंद्र मुगडे, आनंदा पाटील, योगेश कुळमोवडे, सुधाकर पाटील, तानाजी भोसले, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात ईशान्य मॉन्सून दाखल

Farmer Issue : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

Hurricane : आग्नेय आशियानंतर भारतावर ‘यागी’चे ढग

Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

Marathwada Rain : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT