
नांदेड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना (National Food Security) अंतर्गत गळीत धान्य अभियान (सामान्य) योजनेतील शेती अवजारे व कृषी सिंचन सुविधेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अवजारे व सिंचन (Agricultural Instrument) साहित्य खरेदी केली.
परंतु गळीत धान्य अभियान (सामान्य) योजनेतील २१४ शेतकऱ्यांचे एक कोटी ४८ लाख रुपयांचे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे. शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले आहे. या अभियानात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना
पेरणीयंत्र, मळणीयंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, दालमील, विद्युत मोटार, पाइप यांसह अन्य अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय गळीत धान्य (सामान्य) अभियानातून विविध कृषी अवजारे तसेच कृषी सिंचन सुविधेसाठी अर्ज केले होते. यात निवड झालेल्या २१४ शेतकऱ्यांनी अवजारांची खरेदीही केली. या शेतकऱ्यांचे कोटी ४८ लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे. यामुळे शेतकरी कृषी कार्यालयाकडे खेटे मारत आहेत.
दरम्यान, या बाबत कृषी विभागाकडे विचारणा केली. त्यावर शासनाकडून अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. अवजारे खरेदी केल्यानंतर त्याचा शेतीकामासाठी उपयोग केला जातो.
परंतु अनुदान वेळेत मिळाले नाही, तर अशा अवजारांना अनुदानासाठी अडचणी निर्माण होतात. यामुळे शासनाने वेळेवर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी होत आहे.
मागील फेब्रुवारी महिन्यात रोटावेटर खरेदी केले. यानंतर अनुदानाची मागणी केली. परंतु अद्याप अनुदान जमा झाले नाही. कृषी विभागाचे अधिकारी शासनाकडून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याचे सांगत आहेत.
- सुमेध देशमुख, शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.