Agricultural Technology : शेतीसाठी पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक असून, वाढत चाललेल्या जल टंचाईंच्या स्थितीमध्ये पाण्याचे नियोजन करण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यातच हवामान बदलाची स्थिती आणि त्याचे शेती क्षेत्रावरील दूरगामी परिणाम यामुळे गुंतागुंत वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचे अचूक नियोजन आणि जास्तीत जास्त कार्यक्षम व्यवस्थापन करण्यामध्ये अनेक मर्यादा येत आहेत.
या मर्यादावर मात करत पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनानुसार बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधक प्राध्यापकांचा गट गेल्या दोन वर्षांपासून संयुक्तपणे संशोधन प्रकल्प राबवत आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बाष्पीभवनावर काम करण्यात आले. कारण बाष्पीभवन हा जलचक्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. तो पिकांची पाण्याची गरज आणि एकूण उत्पादन क्षमतेवर थेट प्रभाव टाकतो. बाष्पीभवनाच्या दरामध्ये होणारे बदल हे मुख्यतः पर्यावरणीय घटकांवर अवलंबून असतात. या पर्यावरणीय घटकांमध्ये बाष्पोत्सर्जन (इव्हपोट्रान्स्पिरेशन), मातीचा ओलावा, जमिनीचे तापमान, वाऱ्याचा वेग यासारख्या अत्यावश्यक हवामान घटकांचा समावेश आहे.
या घटकांचा अंदाज मिळविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) व माहिती आधारित तंत्रज्ञानाचा (डेटा ड्रिव्हन टेक्निक्स) यांचा वापर केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बारातमी परिसरातील बाष्पीभवनाचे प्रमाण जाणून घेणे व त्याचे संभाव्य अंदाज मिळविणे यावर काम करण्यात आले.
व्ही.आय.टी., पुणे येथील प्राध्यापक डॉ. श्रीनिवास लोंढे, डॉ. प्रज्ञा दीक्षित, डॉ. प्रीती कुलकर्णी, डॉ. योगेश दंडवते आणि ए.डी.टी., बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) नीलेश नलावडे, प्रा. डॉ. योगेश फाटके व तुषार जाधव यांनी एकत्रितरीत्या वेळेआधी संभाव्य बाष्पीभवन आणि प्रत्यक्ष वेळेवर (रियल टाईम) भाकीत वर्तविणारी एक डेटा प्रणाली विकसित केली आहे. त्याचे नाव ‘मल्टीजीन जेनेटिक प्रोग्रामिंग’ असून, या तंत्रज्ञानावर आधारित भारतीय पेटंट प्रकाशित झाले आहे.
या तंत्रज्ञानामुळे दिवसाचे तापमान, आर्द्रता व वाऱ्याचा वेग इ. यांची माहिती वापरून पुढील तीन ते सहा दिवसांच्या बाष्पीभवनाचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. म्हणजेच आपल्या शेतातील मातीची आर्द्रता किंवा ओलावा किती प्रमाणात कमी होणार, याचा अंदाज आपणास आधीच मिळू शकणार आहे. यामुळे पुढील काही दिवसांचा विचार करून सिंचनाचे अचूक वेळापत्रक बनवता येणार आहे. त्यातून पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत मिळेल असा विश्वास संशोधकांना आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सिंचन नियोजनाच्या दिशेने पडलेले हे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.
या संशोधनाच्या पुढील टप्प्यात या प्रणालीला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांना त्यांचे सिंचनाचे अचूक वेळापत्रक त्वरीत उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी मातीतील ओलावा व तापमान यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रियल टाईम मॉनिटरिंग व फोरकास्टिंग प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.
कृत्रिम बद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर
कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून क्रांतिकारी बदल घडविण्यासाठी प्रतापराव पवार यांच्या पुढाकाराने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र आणि परदेशातील नामवंत संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमातून विकसित होत असलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार केला जात आहे. उदा. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सॅटेलाईट मॅपिंग, स्मार्ट ॲग्रीकल्चर इ.
संशोधनाची प्रमुख उद्दिष्टे
सिंचन व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवणे.
पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करून अपव्यय टाळणे.
पिकांच्या उत्पादन वाढीस मदत करणे.
जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सिंचन प्रणाली तयार करणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.