Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Agriculture Production : व्यवस्थापन विक्रमी उत्पादनाचे

Agriculture Management : अधिक उत्पादनाचे अंदाज वर्तविले म्हणजे त्या शेतीमालास मागणी कमी राहून दरही खालीच राहतात, असा सर्वसाधारण सर्वच शेतीमालाबाबतचा मार्केट ट्रेंड आहे.

विजय सुकळकर

Indian Agriculture : देशात २०२४-२५ च्या खरीप हंगामात पिकांचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा पहिला अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकताच जाहीर केला आहे. राज्यांतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या वर्षी खरिपातून अन्नधान्य उत्पादन १६४७.०५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ८९.३७ लाख टनांनी, तर खरीप सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा १२४.५९ लाख टनांनी अधिक आहे.

अर्थात, हा पहिला आगाऊ अंदाज आहे, यापुढे दुसरा, तिसरा सुधारित अंदाज जाहीर होऊन त्यातून नक्की किती उत्पादन मिळणार हे स्पष्ट होईलच. खरीप, रब्बी हंगाम पीक पेरणी क्षेत्र असो की त्यातून मिळणारे उत्पादनाचे अंदाज आणि प्रत्यक्षातील आकडे यांत बरीच तफावत आढळून येते. ड्रोनद्वारे सर्वेक्षण तसेच सॅटेलाइट मॅपिंग अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड क्षेत्र आणि उत्पादनांच्या अंदाजात अधिक अचूकता येणे आवश्यक आहे.

खरेतर मागील पाच-सहा वर्षांपासून देशभर चांगला पाऊस पडतोय, परिणामस्वरूप खरीप तसेच रब्बी हंगामातील उत्पादनवाढीला चालना मिळत आहे. याच काळात पाणीटंचाई, अतिवृष्टी, महापूर, गारपीट अशा काही नैसर्गिक आपत्ती येऊन त्यात शेतीमालाचे नुकसानही झाले. परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण कष्टातून या देशातील शेतकरी विक्रमी अन्नधान्य उत्पादन काढत आहेत. यातून त्यांची शेतीप्रति निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नच दिसून येतात.

अन्नधान्यामध्ये भात, गहू, मका यांचेच उत्पादन वाढत आहे आणि त्यामुळेच तृणधान्यांत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. मात्र डाळी (कडधान्ये) आणि खाद्यतेलात (तेलबिया पिके) आपल्याला अजूनही स्वयंपूर्णता लाभलेली नाही. अशावेळी भात, गहू उत्पादक राज्यांमध्ये कडधान्ये, तेलबिया पिकांबरोबर फळे-भाजीपाला पिकांचे क्षेत्र आणि पर्यायाने उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

अन्नसुरक्षेबरोबरच आता पोषण सुरक्षेलाही महत्त्व येत असल्याने अधिक पोषणमूल्ययुक्त अन्नधान्यांचे उत्पादन घ्यावे लागेल. त्याकरिता अन्नधान्यांच्या अधिक पोषणमूल्ययुक्त जाती निर्माण करून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. देशात अन्नधान्यांचे उत्पादन वाढत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगतोय, हेही लक्षात घ्यायला हवे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पिकांची उत्पादकता वाढवावी लागेल, पीक उत्पादन खर्च कमी करावा लागेल, त्याच वेळी अन्नधान्याला रास्त भाव मिळेल हेही पाहावे लागेल. आपल्या देशातील पिकांची उत्पादकता प्रगत देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि काटेकोर पीक व्यवस्थापनातून पिकांची उत्पादकता तीन ते चार पटीने वाढू शकते. देशांतर्गत गरजेपेक्षा अधिक उत्पादनाचे अंदाज वर्तविले म्हणजे मागणी कमी राहून दरही खालीच राहतात, असा सर्वसाधारण सर्वच शेतीमालाबाबतचा मार्केट ट्रेंड आहे.

या वर्षी तर बहुतांश शेतीमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही. अशावेळी केवळ उत्पादनवाढीच्या अंदाजाने दर अजून खाली जाणार नाहीत, ही काळजीही घ्यावी लागेल. देशात अन्नधान्य उत्पादन वाढत असताना त्यांची खरेदी, साठवणूक आणि ते अन्नधान्ये योग्य पद्धतीने खऱ्या गरजूपर्यंत पोहोचविण्याची सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल. काढणीपश्‍चात सेवा सुविधा, अन्नधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारावे लागतील. देशात गरज नसताना केवळ भाववाढीच्या भीतीने कोणतेही अन्नधान्य आयात होणार नाही, त्याचबरोबर गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य सवलत देऊन निर्यात करायला हवीत. अशा प्रकारच्या उपाय योजनांनी अन्नधान्यांचे उत्पादन वाढत असताना त्यांना रास्त भाव मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर

FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप

Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार

Drug case: अमलीपदार्थ कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा घ्या : हर्षवर्धन सपकाळ

Khandesh Farmer Issue: ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीककर्ज वसुली

SCROLL FOR NEXT