Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीनचे भाव आणखी नरमतील का?

Team Agrowon

Soybean Arrival : देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दरात सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. पण सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही. परिणामी सोयाबीन उत्पादनक अडचणीत आले. ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजार दबावात आला.

तर खाद्यतेलाचे भाव पडल्याचाही परिणाम दरावर जाणवत आहे. त्यातच केंद्राने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली. पण याचा सोयाबीन दरावर परिणाम होण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले.

गेल्या हंगामात सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव पाहिल्यानंतर यंदाही दरात अशीच वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील हंगामात मार्च महिन्यानंतर सोयाबीन भावात सुधारणा झाली होती. मार्चपर्यंत भावपातळी ५ हजार रुपयांच्या दरम्यान होती.

मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के सोयाबीन विकले होते. सहाजिकच तेजीचा फायदा अगदी बोटावर मोजण्याएतक्या शेतकऱ्यांनाच मिळाला. मागील हंगामात कमी भावात सोयाबीन विकल्यानंतर दरात तेजी आल्याचे पाहून, यंदा शेतकऱ्यांनी मार्चनंतर सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यंदा सोयाबीन मार्चनंतर बाजारात आले.

पण यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन उत्पादनात वाढ झाली. अर्जेंटीनात उत्पादन घटले पण ब्राझीलने मोठी झेप घेतली. ब्राझीलमध्ये यंदा १ हजार ५०० लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. ब्राझील देशात सोयाबीनचे गाळप खूपच कमी करतो.

ब्राझील थेट सोयाबीन निर्यातीला जास्त प्राधान्य देत असतो. ब्राझीलचं सोयाबीन बाजारात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारा सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. १५ डाॅलरच्यवर असलेलं सोयाबन १४ डाॅलरपेक्षा कमीच राहीलं.

तर ५०० डाॅलरचा टप्पा गाठलेल्या सोयापेंडने मागील दोन महिन्यात क्विचितच ४०० डाॅलरचा टप्पा गाठला. सहाजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा देशातील बाजारावर दबाव आला.

दुसरीकडे उत्पादन वाढून मागणी थंड असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचे दर पडले. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु असल्याने तेलाचे साठे पडून होते. पण निर्यातीबाबत तोडगा निघाल्यानंतर दोन्ही देशांनी कमी भावात सूर्यफुल तेलाचा साठा बाजारात आणला.

दुसरीकडे मागील दोन वर्षे देशात खाद्यतेलाचे भाव वाढले होते. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपात केली. दोन वर्षात ४० लाख टन कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यासही परवानगी दिली होती.

यामुळे देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा आला. सर्वच खाद्यतेलाचे भाव जवळपास ४० टक्क्यांपर्यंत कमी झाले. सूर्यफुल तेलाची आयात वाढल्याने पहिल्यांदा सोयाबीन तेल सूर्यफुल तेलापेक्षा महाग झाले. सहाजिकच सूर्यफुल तेलाला मागणी वाढली. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होत होता.

देशात खाद्यतेलाचे साठे

देशात खाद्यतेल आयात वाढून साठे वाढले. तेल कमी दरात मिळूनही आयात कमी होत होती. त्यामुळे सरकारने खाद्येतल आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादारांनी आयातशुल्काची मागणी केली. देशात खाद्यतेल स्वस्त झाल्याने सरकार आयातशुल्कात वाढ करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

पण बुधवारी सरकारने सर्वांनाच धक्का दिला. सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि रिफाईंड सूर्यफुल तेल आयातशुल्कात ५ टक्क्यांची कपात केली. १७.५० टक्क्यांवरून आयातशुल्क १२.५० टक्क्यांपर्यंत कमी केले.

आता १३.७५ टक्के आयातशुल्क लागणार आहे. देशात सध्या रिफाईंड तेलाची आयात होत नाही. तसेच आयातशुल्क कमी केले तरी आयात परवडणारी नाही, असे आयातदारांच्या वतीने सांगण्यात आले.

निर्णयाची गरज होती का?

देशात खाद्यतेलाची आयात गेल्यावर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढली. खाद्यतेलाचे भावही कमी झाले. यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतर सोयाबी नच्या दरातही क्विंटलमागं ५०० रुपयांची नरमाई आली. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

आजही शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी भाववाढीची वाट पाहत आहेत. सोयापेंडचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामुळे दबावात आहे. तसेच देशातही यंदा सोयाबीन पुरवठा जास्त होता. त्यामुळे सोयापेंड उत्पादन जास्त राहणार आहे.

परिणामी सोयापेंडकडून सोयाबीन दराला यापुढे मिळणारा आधार कमीच राहीला. यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. पण सरकारने उलटं आयातशुल्कात कपात केली.

सोयाबीनवर काय परिणाम होऊ शकतो?

सध्या सोयापेंडचे भाव नरमले आहेत. खाद्यतेलही दबावात आहे. त्यामुळे सोयाबीन भावही कमी झाले. पण सध्याच्या भावपातळीपेक्षा सोयाबीनचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीन सरासरी ५ हजारांच्या कक्षेत राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

पण यंदा देशात पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच सोयाबीनचा पेरा नेमका किती होतो? पेरणी वेळेवर होते का? आणि उत्पादनाचे अंदाज काय येतात? यानुसारही बाजाराची दिशा बदलेलं, असेही जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT