
Edible Oil News : देशात यंदा खाद्यतेल आयातीत २० टक्क्यांची वाढ झाली. सरकारने आयातशुल्कात मोठी कपात केल्याने आयातीचा लोंढाच आला. याचा दबाव देशातील सोयाबीन आणि मोहरी बाजारावर झाला. देशात खाद्यतेलाची पुरेशी आयात झाल्याने आयातशुल्कात वाढ करण्याीच मागणी केली जात होती.
खुद्द उद्योगांकडूनही ही मागणी रेटली जात होती. पण आयातशुल्कात वाढ करण्याऐवजी सरकारने रिफाईंड खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली. आयातशुल्क १७.५० टक्क्यांवरून १२.५० टक्क्यांवर आणले आहे. आता रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयातीवर एकूण १३.७५ टक्के आयातशुल्क असेल. तर कच्च्या तेलावर ५.५० टक्के शुल्क लागू आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेल आयात वाढीसाठी आयातशुल्कात कपात केली होती. कच्चे सोयाबीन, कच्चे सूर्यफुल आणि कच्चे पामतेल आयातीवरील शुल्क सरकारने ५.५० टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर देशात आयातीचा लोंढाच आला. परिणामी देशातील तेलबियांचे भाव पडले होते.
याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. त्यातच सूर्यफुल तेल निर्यातदार युक्रेन आणि रशियाने कमी भावात तेल बाजारात उतरवले. यामुळे सध्या सूर्यफुल तेल सोयाबीन तेलापेक्षा स्वस्त झाले. याचा दबाव सोयाबीन बाजारावर दिसत आहे.
देशात यंदा गेल्यावर्षीपेक्षा खाद्यतेलाची आयात २० टक्क्यांनी वाढली. आयात वाढल्याने देशात खाद्यतेलाचे साठे पडून आहे. यामुळे आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली जात होती. पण सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयातीवरील आयात शुल्कात कपात केली.
केंद्राने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयातशुल्क १७.५ टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत कमी केले. याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली. आता रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयातीवर एकूण १३.७५ टक्के आयातशुल्क असेल.
उद्योगांनी कच्चे आणि रिफाईंड खाद्यतेल आयात शुल्कातील तफावत कमी झाल्याने रिफाईंड तेलाच्या आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितले. देशात सध्या रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात होताना दिसत नाही. पामतेलाचे भाव कमी झाल्याने यंदा आयात वाढली आहे.
आयातीचा लोंढा
नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांमध्ये देशात ५३ लाख ४८ हजार टन पामतेलाची आयात झाली. गेल्यावर्षी याच काळात झालेल्या आयातीचा विचार करता यंदा पामतेल आयात ४९ टक्क्यांनी वाढली. तर सोयाबीन तेलाची आयात यंदा २० टक्क्यांनी कमी होऊन २० लाख ४४ हजार टनांवर स्थिरावली.
सूर्यफुल तेलाच्या आयातीत मात्र यंदा ३५ टक्क्यांनी वाढली. भारताने या सात महिन्यांमध्ये यंदा १६ लाख ६२ हजार टन सूर्यफुल तेल आले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाच्या तुलनेत पामतेल आणि सूर्यफुल तेल स्वस्त झाल्यामुळे आयात वाढली आहे.
धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर
आंतरराष्ट्रीय बाजारात रिफाईंड तेलाचेही भाव कमी झाले आहेत. देशातील खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकार थेट रिफाईंड तेल आयातवाढीचे प्रयत्न करत आहे. पण याचा फटका देशातील रिफायनरी उद्योगांनाही बसू शकतो. तसचं देशातील खाद्यतेलाचे भाव आणखी दबावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उद्योगांच्या मते रिफाईंड तेलाचे आयातशुल्क कमी केले तरी आयात परवडणारी नाही.
सध्या देशात सोयाबीन आणि मोहरीचे भाव दबावात आहेत. खाद्यतेलाची आयात वाढून भाव कमी झाल्याचा परिणाम बाजारावर झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची गरज होती. पण सरकारने उलट रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाच्या आयातशुल्कात कपात केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह उद्योगांनीही नारजी व्यक्त केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.