Paddy Farming
Paddy Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Paddy : शेतकरी नियोजन : पीक भात

टीम ॲग्रोवन

शेतकरी ः शरद गणपत धुरी

गाव ः झाराप, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण शेती ः ८ एकर

भात शेती ः २ एकर

झाराप (ता. कुडाळ) येथे शरद गणपत धुरी यांची ८ एकर शेतजमीन आहे. त्यातील पाच एकरांमध्ये आंबा (Mango), काजू (Cashew), नारळ, सुपारी, पेरू, चिकू, लिंबू आदी फळपिकांची लागवड (Horticulture) आहे. तर उर्वरित दोन एकरांमध्ये खरीप हंगामात भात पीक लागवडीचे (Paddy Cultivation) त्यांचे नियोजन असते. भात शेतीतील सर्व कामे यंत्राद्वारे करण्यावर त्यांचा भर असतो. दिवसेंदिवस मजुरांची अनुपलब्धता हा शेतीसमोरील भीषण प्रश्‍न आहे. त्यामुळे भात शेतीत पूर्णपणे यांत्रिकीकरणाचा अवलंब करत असल्याचे शरदराव सांगतात.

यांत्रिकीकरणावर भर ः

भात पिकामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राद्वारे करण्यावर त्यांचा भर असतो. त्यानुसार आवश्यक सर्व यंत्राची खरेदी त्यांनी केली आहे. यामध्ये भात रोपवाटिका तयार करण्यासाठी साचे, पॉवर टिलर, भात लागवड यंत्र, कापणी यंत्र, मळणी यंत्र अशी विविध यंत्रसामग्री त्यांच्याकडे आहे. यंत्राद्वारे भात रोपांची पुनर्लागवड करत असल्यामुळे लॉन पद्धतीने रोपवाटिका तयार केली जाते. तसेच गाव परिसरातील शेतकऱ्यांना लॉनवर तयार केलेल्या रोपांची ते विक्री करतात. या वर्षी सुमारे दीड ते २ हजार लॉनची प्रति लॉन ६० ते ७० रुपये दराने त्यांनी विक्री केली.

भात रोपवाटिका ः

- भात रोपांची पुनर्लागवड प्रामुख्याने यंत्राद्वारे करत असल्यामुळे लॉन पद्धतीने रोपवाटिका तयार केली. त्यासाठी साधारण ८० लॉन तयार केले.

- भात बियाणे पाण्यात २४ तास भिजत ठेवले. त्यानंतर पाण्यातून बियाणे बाहेर काढून गोणपाटावर पुन्हा २४ तास ठेवले. या कालावधीत भात बियाणास लहान-लहान कोंब येतात.

- यंत्राद्वारे भात लावणी करण्यासाठी विशिष्ट आकाराच्या साच्यामध्ये भात बियाणे पेरले.

- त्यासाठी माती आणि शेण प्रत्येकी प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे घेऊन बारीक करून चाळणीने चाळून घेतले. त्यानंतर या मिश्रणात काही प्रमाणात गांडूळ खत आणि सेंद्रिय खत एकत्र मिसळून घेतले. तयार मिश्रणाने साचे अर्धा इंच प्रमाणात भरून घेतले.

- प्रत्येक साच्यामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम कोंब आलेले बियाणे पसरले. त्यावर मातीचा हलका थर देऊन वरून गवत टाकले.

- सर्व साचे शेतामध्ये मोकळ्या जागी ठेवून दिले. रोपांना दोन दिवसांआड झारीने पाणी दिले. साधारणपणे १८ ते २० दिवसांत भात रोपे पुनर्लागवडीसाठी तयार झाली.

- या वर्षी १५ मे रोजी भात रोपवाटिका तयार करण्याची कामे पूर्ण केली. लागवडीसाठी साधारण १२ संकरित वाणांचे बियाणे वापरले आहे.

यंत्राद्वारे पुनर्लागवड ः

- पेरणीनंतर साधारण १८ ते २० दिवसांत साच्यातील रोपे पुनर्लागवडीस तयार झाली. साधारणपणे ८ इंच उंचीची रोपे लागवडीसाठी निवडली.

- पुनर्लागवडीपूर्वी शेतामध्ये एकरी दीड टन प्रमाणे शेणखत, गांडूळ खत, सेंद्रिय खते पसरून घेतली.

- त्यानंतर ट्रॅक्टरच्या मदतीने ३ वेळा जमीन चांगली नांगरून लागवडीसाठी तयार केली.

- योग्य प्रकारे चिखलणी झाल्यानंतर बेड राइस ट्रान्सप्लांटर यंत्रामध्ये रोपे ठेवू लावणी केली. दोन रोपांत ६ इंच तर दोन ओळींत १ फूट अंतर ठेवत यंत्राद्वारे रोपांची पुनर्लागवड केली. साधारणपणे ६ ते ७ जुलै या कालावधीत पुनर्लागवडीची कामे पूर्ण केली.

- यंत्राद्वारे पुनर्लागवड केल्यामुळे एकसमान अंतरावर लागवड होते. तसेच कमी वेळेत अधिक क्षेत्रावर लागवड शक्य होत असल्याचे शरदराव सांगतात.

पुनर्लागवडीनंतरचे कामकाज ः

- जमिनीची चांगली मशागत करून नंतर रोप लागवड केल्यामुळे पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत नाही. काही

प्रमाणात उगवलेले तण कोनोविडरच्या मदतीने काढले जाते.

- भात पिकामध्ये खाचरात पाण्याचा योग्य पातळी राखली जाते. पावसामुळे फुटलेल्या बांधाची दुरुस्ती केली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहण्यास मदत झाली.

- वाढीच्या काळात पिकास रासायनिक खतांच्या शिफारशीप्रमाणे मात्रा दिल्या.

आगामी नियोजन ः

- येत्या काही दिवसांत भातपीक परिपक्व होईल. पावसाची उघडीप पाहून यंत्राद्वारे कापणीस सुरुवात करणार आहे.

- कापणी पूर्ण झाल्यानंतर यंत्राद्वारेच मळणीची कामे केली जातील. त्यानंतर हलके ऊन देऊन पोत्यात भरले जाईल.

----------------

- शरद धुरी, ८५५०९२७७४२

(शब्दांकन ः एकनाथ पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT