Water Bund Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bunds : श्रमदानातून गावकऱ्यांनी बांधले ३,१२० बंधारे

Team Agrowon

Ratnagiri News : कमी पावसामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद स्तरावर ‘मिशन बंधारे’ मोहिमेला दिवाळीपूर्वीच गती देण्यात आली होती. आतापर्यंत लोकसहभागातून ग्रामपंचायत स्तरावर ३,१२० बंधारे गावपातळीवर बांधण्यात आले आहेत.

यंदा जिल्हा परिषद स्तरावरून ‘मिशन बंधारे’ मोहीम ग्रामपातळीवर गतिमान करण्यात आली होती. ही मोहीम वेगाने राबविली जावी यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी स्वतः गुहागर येथे बंधारे बांधण्यासाठी श्रमदान केले होते. दरवर्षी दिवाळीनंतर गतिमान केली जाणारी ही मोहीम या वेळेस दसऱ्यापूर्वीच सुरू करण्यात आली होती.

२०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना प्रति दहा बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा ८,४६० कच्चे, वनराई आणि विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०२२-२३ मध्ये ३,०३३ बंधारे बांधण्यात आले होते. यंदा पाऊस सरासरीदेखील गाठू न शकल्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केले आहे. ग्रामपातळीवर तेथील नदीनाल्यांवर बंधारे उभारण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामस्थांचा सहभाग घेतला जात आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान दहा बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये सुमारे १,२०० हून अधिक बंधाऱ्यांची ग्रामस्तरावर उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत एकूण ३,१२० बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये कच्चे बंधारे १,६५२, वनराई बंधारे ६३८, विजय बंधारे ८३० इतके बांधून पूर्ण झाले आहेत.

दापोली, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात मोहिमेला आघाडी मिळाली आहे. यंदा पावसाने लवकर विश्रांती घेतल्यामुळे बंधारे बांधण्यासाठी नदी, नाल्यांच्या पात्रात पाणी कमी आहे. प्रवाहित पाणी कमी असल्यामुळे बंधारे बांधण्याच्या कामाला गावागावांत वेग आला आहे. महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गावागावांमध्ये होणाऱ्या निवासी शिबिरांमध्येही नाल्यांवर बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईवर मात

जिल्ह्यात यंदा पाऊस सप्टेंबर अखेरीस संपला. नोव्हेंबरमध्ये थंडी पडण्याऐवजी ऑक्टोबरचा उष्म्याचा कडाका डिसेंबरच्या मध्यानंतरही कायम राहिला. सध्याचे वाढलेले तापमान पाहता जिल्ह्याला पाणीटंचाईला लवकर सामोरे जावे लागणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिपळूण तालुक्यातील दोन गावांमध्ये तर पाणीटंचाई सुरू झाली आहे.

जिल्ह्याचा टंचाई आराखडा अजून तयार झालेला नाही. टंचाईवर मात करण्यासाठी गावागावात राबवण्यात येणारे बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. या पाण्यावर काही शेतकरी भाजीपाला लागवडही करत आहेत. त्यामधून अर्थार्जनाचे साधन तयार झाले आहे.

बंधारे उभारण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः जिल्ह्यात पाहणी करत आहेत. काही ठिकाणी त्यांनी सहभागही घेतला आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची बचत होत आहे.
अजय शेंड्ये, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

मोहिमेची आतापर्यंत स्थिती

तालुका एकूण बंधारे

मंडणगड २४२

दापोली ५४५

खेड २२०

गुहागर २५७

चिपळूण ३१७

संगमेश्वर ५६०

रत्नागिरी २७३

लांजा २६२

राजापूर ४४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT