Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming: वीस वर्षे जुन्या आंबा बागेचे होणार नूतनीकरण

Mango Orchard Management: तालुक्यातील रुईभर येथे देशातील पहिली अतिघन पद्धतीने लागवड केलेली आंबा बाग आहे. या बागेला यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. अजूनही चांगल्या उत्पादनक्षम असलेल्या या बागेची दुरुस्ती करून तिला नवे रूप देण्यात येणार आहे.

Team Agrowon

अविनाश पोफळे  

Dharashiv News: धाराशिव तालुक्यातील रुईभर येथे देशातील पहिली अतिघन पद्धतीने लागवड केलेली आंबा बाग आहे. या बागेला यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. अजूनही चांगल्या उत्पादनक्षम असलेल्या या बागेची दुरुस्ती करून तिला नवे रूप देण्यात येणार आहे. अतिघन आंबा लागवड जास्त काळ टिकत नाही, या शंकेला या बागेने खोटे ठरविले आहे. 

ज्येष्ठ आंबा फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुईभर येथील अविनाश चव्हाण यांच्या शेतात २००६ मध्ये देशात पहिल्यांदा अतिघन पद्धतीने केसर आंबा बागेची लागवड केलेली आहे. डॉ. कापसे यांनी लागवडीला २० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त नुकतीच या बागेची पाहणी केली. चव्हाण यांच्या सून वृषाली चव्हाण सध्या या बागेकडे लक्ष देत आहेत. 

डॉ. कापसे म्हणाले, की राज्यात आंब्याचे केसर वाण १९९० मध्ये आले. त्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा लागवड १५ बाय २०, तसेच १५ बाय १५ फुटांवर करायला लावली. त्यानंतर जालना जिल्ह्यातील जिरडगाव येथे २००० मध्ये ५०० एकरांवर आंबा लागवड केली. त्याचे अंतर पाच बाय पाच मिटर होते.

दरम्यान, मी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेलो. त्या ठिकाणी एक आठवड्याची आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होती. त्या वेळी तेथील ५ हजार एकर आंबा बागेस भेट दिली. ही बाग एक बाय चार मीटर आणि दीड बाय सहा मीटर अंतर अशी होती. या बागेच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. येथे आल्यानंतर रुईभर येथील उद्योजक श्री. चव्हाण यांची ओळख झाली.

ते जिरडगावचे जावई. चव्हाण यांना आंबा बाग लावायची होती. त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेतील अतिघन बाग लावण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानुसार रुईभर येथे देशातील पहिला प्रयोग करीत अतिघन पद्धतीने केसर आंब्याची लागवड केली. त्यानंतर २००७ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील डाकेफळ येथे १२ एकरांवर केसरची दुसरी अतिघन लागवड केली. या दोन्ही बागा १९ वर्षांनंतर अजूनही चांगल्या उत्पादनक्षम आहेत.

‘‘रुईभर येथील अतिघन लागवडीनंतर राज्यभरात या पद्धतीने लागवड वाढवीत गेलो. २०११ पासून ही लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. सध्या राज्यात ११ हजार हेक्टरवर अतिघन केसर आंबा लागवड आहे. या लागवडीचे खूपच फायदे आहेत. झाडे लहान ठेवली जात असल्याने हाताने फळे काढता येतात. सगळी कामे हाताने करता येतात. छाटणी, विरळणी, फवारणी करणे सहज सोपे आहे,’’ असे डॉ. कापसे म्हणाले. 

सर्वसाधारण लागवड...१० बाय १० मीटर

घन लागवड...५ बाय ५ मीटर

अतिघन लागवड...१.५ बाय ४.५ मीटर

केसर आंब्याची येथील अतिघन लागवड २० व्या वर्षीही यशस्वी आहे. अतिघन लागवड जास्त काळ टिकत नाही, असे जे म्हणतात त्यात तथ्य नाही. त्यासाठी हे उदाहरण समोर आहे. सध्या या बागेतील एक झाड १५ किलो उत्पादन देत आहे. आता या बागेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रति झाड २० किलो उत्पादन मिळेल.
- डॉ.  भगवानराव कापसे,  ज्येष्ठ आंबा फळबाग तज्ज्ञ
यंदाच्या हंगामात १९ वर्षे पूर्ण झालेल्या अतिघन लागवडीतील ७०० झाडांपासून १२ टन आंबा उत्पादन मिळाले. बागेचे नूतनीकरण केल्यानंतर ते आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
- वृषाली चव्हाण,  शेतकरी, रुईभर, ता. धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

SCROLL FOR NEXT