Chhatrapati Sambhajinagar: माती निरोगी नाही, तिचे गुणधर्म असंतुलित झाल्याने शेतीतल्या अडचणी वाढल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपसंचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शनातून व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रम आणि शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी (ता. १) करण्यात आले होते. ‘इफ्को’ व ‘कृभको’ यांच्या संयुक्त सहकार्यातून आयोजित कार्यक्रमात ‘खरीप पिकात रासायनिक खताचा संतुलित वापर व अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. कौसडीकर बोलत होते.
या कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके, विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाचे प्रचारक दीपक जोशी, शेतीनिष्ठ शेतकरी दत्तू धोत्रे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयिका डॉ. दीप्ती पाटगावकर, ‘इफ्को’चे क्षेत्रीय अधिकारी कलीम शेख, ‘कृभको’चे जिल्हा व्यवस्थापक आशिष उमक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. कौसडीकर म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांच्या बहुतांश भागात २३ टक्के जमिनीत सहा अन्नद्रव्यांची कमतरता दिसते. मुळात पिकांच्या अन्नद्रव्याची ८० टक्के गरज जमीनच भागवते.केवळ २० टक्के अन्नद्रव्य बाह्य स्वरूपात आपण देऊ शकतो. त्यामुळे जमिनीचे व्यवस्थापन करीत असताना जमिनीची रचना आपल्याला समजून घ्यावे लागेल. जमीन चांगली उत्पादक राहण्यासाठी १७ अन्नद्रव्याचा पुरवठा आवश्यक आहे.
व्यवस्थापन करताना या सर्व अन्नद्रव्यांच्या पुरवठा केला जात नाही. त्यामुळे पिकाचे अवशेष, जैविक खत व्यवस्थापन या माध्यमातून जमिनीचा सजीव कोणाला टिकवून ठेवावे लागेल. हवामान, बियाणे हे महत्त्वाचे आहेच. शिवाय मिळणाऱ्या बाजारभावावर बरीच चर्चा होते. मुळात उत्पादित मालापैकी ५० टक्केच माल अ दर्जाचा असतो. उर्वरित ५० टक्के माल ब व क दर्जाचा असतो.
त्या उर्वरित मालाचा दर्जा सुधारल्यास बऱ्यापैकी बाजार भावाचा प्रश्न निकाली काढता येईल. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांना खत उपलब्धता माहिती होण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या ब्लॉगविषयी माहिती दिली. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयिका डॉ. पाटगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी तर प्रवीण सरकलवाड यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांचा गौरव
पुरस्कार प्राप्त तसेच प्रयोगशील असणाऱ्या शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये भरत आहेर, दीपक चव्हाण, भालचंद्र घुनावत, गोरखनाथ गोरे, बाबासाहेब पडूळ, लक्ष्मण आहेर, यज्ञेश कातबने, दत्तू धोत्रे, दादासाहेब शिंदे, अनिल शेळके, गोरख बोबडे, संजय पवार, कालिंदी जाधव, अविनाश वेताळ यांच्यासह कृषीचे कर्मचारी संजय साठे पाटील यांचा समावेश आहे.
शेतीला दिली दिशा
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या शेतीला दिशा देण्याचे काम केले. शेती संबंधित सत्तेचे विकेंद्रीकरण करून त्याचे सक्षमीकरण केले. अनेक महत्त्वाच्या योजना त्यांच्याच कारकिर्दीत महाराष्ट्रात कार्यान्वित झाल्या. त्यामुळे आत्ताचे प्रगत शेतीचे दिवस आपल्याला अनुभवायला येत असल्याचे श्री. देशमुख म्हणाले.
हवामान बदलाचा सामना करताना जमिनीचे आरोग्य जपल्याशिवाय पर्याय नाही. सूक्ष्म जिवाणूंची संख्या जास्त असलेल्या शेतकऱ्यालाच यापुढील काळात चांगले उत्पादन मिळेल. त्यामुळे आपल्या आरोग्यासोबतच जमिनीचेही आरोग्य जपावेच लागेल.- डॉ. सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.