Pune News : जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेस सोमवारी (ता.३०) मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार ७६४ हेक्टर जमिनीवर सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांना विकासाची नवी संधी मिळणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार आहे.
या निर्णयानुसार, जामनेर तालुक्यातील ३१, जळगाव तालुक्यातील २८ आणि पाचोरा तालुक्यातील १६ अशा एकूण ७५ गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यामुळे जामनेर तालुक्यातील ११ हजार ३८८ हेक्टर, जळगाव तालुक्यातील १४ हजार २२४ हेक्टर, आणि पाचोरा तालुक्यातील ५ हजार १५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
उपसा सिंचन योजनेच्या विस्तारामुळे या परिसरात जलस्रोतांची उपलब्धता वाढणार आहे. ज्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भविष्यातील पाणीटंचाईच्या समस्यांवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
प्रकल्पात जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील एकूण ४९ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प समाविष्ट आहेत, ज्यामुळे या भागात पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. गोलटेकडी लघु पाटबंधारे तलाव आणि एकुलती साठवण तलाव देखील या योजनेत समाविष्ट आहेत.
जामनेर, जळगाव आणि पाचोरा तालुक्यातील ७५ गावांतील शेतीला जलस्रोत उपलब्ध होणार असून, यामुळे भागपूर धरणापासून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत सिंचनाचा लाभ होणार असून या भागातील शेती अधिक समृद्ध होणार आहे.
"या योजनेचा सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्याने जळगाव व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे."गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.