Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपल्यावर दरात सुधारणा

Team Agrowon

Jalgaon News : देशात विक्रमी कापूस उत्पादनाचे हवेतले अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर कापूस खरेदीदार, व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहेत. शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांना यंदा कापसाला सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत. कापसाचे तीन-चार वेगवेगळे दर यंदाही होते. हमीभावात कापूस खरेदी फक्त सुमारे सहा ते सव्वासहा लाख कापूसगाठींएवढी (एक गाठ १७० किलो रुई) झाली आहे.

याचा अर्थ देशातील फक्त २६ ते २७ लाख क्विंटल कापसाची हमीभावात (७०२० रुपये) खरेदी झाली आहे, तर २१० लाख गाठींएवढ्या कापसाची खरेदी सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटलने खासगी खरेदीदार, व्यापाऱ्यांनी केली आहे.

एक कापूसगाठ तायर करण्यासाठी पाच क्विंटल कापसाची आवश्यकता असते. कापसाचे उत्पादन देशात सतत चार वर्षे गुलाबी बोंड अळी व नैसर्गिक समस्यांमुळे कमी-कमी होत आहे.

परंतु वस्तुस्थिती दुर्लक्षित करून देशात १२७ ते १२९ लाख हेक्टरवर कापूस लागवड होते, हाच मुद्दा धरून कापूस उत्पादनाचे अंदाज व्यक्त करण्यात आले. कापूस दर मागील नऊ महिन्यांपासून ६६००, ६८०० ते ७१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

कमी दर्जाच्या कापसाची ५००० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी व्यापाऱ्यांनी केली. दुसरीकडे हमीभावासाठी शासनाने ठोस कार्यवाही केलेली नाही, अशी स्थिती आहे.

बाजार अस्थिर

यंदा कापूस बाजार अस्थिर आहे. शेतकऱ्यांना मोठा तोटा कापूस पिकात आला आहे. देशात यंदा २९० ते २९५ लाख कापूस गाठींचे उत्पादन येईल, असे म्हटले जात आहे. परंतु कमी पाऊसमान, गुलाबी बोंड अळी आदी संकटांनी कापूस पीक पुरते खराब झाले.

२९५ लाख गाठींचे उत्पादन होईल की नाही, याबाबतही शंका आहे. परंतु कापूससाठा अधिक आहे, अशी बतावणी खरेदीदार, विविध कापूस व्यापारातील संघटनांनी सातत्याने केली. डिसेंबर, जानेवारीत कापूस आवक प्रतिदिन सरासरी एक लाख ८० हजार गाठींएवढी झाली आहे.

शेतकऱ्यांकडील कापूससाठा ज्या वेळेस १८ ते २० टक्के एवढा असतो व कमाल कापूस खरेदीदार, व्यापारी, कारखानदारांकडे पोचतो, त्या वेळेस कापूस दरवाढ सुरू होते, असा मुद्दा यानिमित्त जाणकार उपस्थित करीत आहेत.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडील साठ्याचे सर्वेक्षण
शेतकऱ्यांकडे गावोगावी किती कापूससाठा आहे, याचे सर्वेक्षण, अंदाज एजंटच्या मदतीने व्यापारी आदींनी घेतले होते. शेतकऱ्यांकडील कापूससाठा ७० ते ७५ टक्के एवढा होता, त्या वेळेस कापूसदरावर सतत दबाव होता.

परंतु शेतकऱ्यांकडील कापूससाठा १५ ते १६ टक्के एवढा झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात, या कापूस दरवाढीचा, सुधारणांचा लाभ फारसा शेतकऱ्यांना सध्या होत नसल्याचे दिसत आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली.

देशात कापसाचे उत्पादन घटले आहे. जगातही अपेक्षित कापूस नाही, असे दोन वर्षे चर्चिले जात आहे, पण दोन हंगामांपासून शेतकऱ्यांना चांगला कापूसदर मिळाला नाही. ज्या वेळेस शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपतो, त्याच वेळी कापूस बाजार सुधारतो, हा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. सुधारित दराचा लाभ खरेदीदार, कारखानदारांना होत आहे. शासनाने कापूस उत्पादकांचा तोटा भरून काढण्यासाठी ठोस योजना आणावी.
किरण पाटील, शेतकरी, सनपुले (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT