Mango Fruit Protection: उन्हाचा पारा वाढत असताना पुन्हा अवकाळी पावसाने डोकं वर काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागात गारपिटीसह पावसाने आंबा आणि काजू पिकाला झोडपलं आहे. आंबा आणि काजू हे दोन्ही सध्या पक्वता ते काढणीच्या अवस्थेत असल्याने पाऊस आणि गारपिटीसाठी ते संवेदनशील आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना करुन फळांचे उत्पादन वाचवणे गरजेचे आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने पिकांसाठी सल्ला दिला आहे.
आंबा बागांमध्ये वाढते तापमान, अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे फळगळ झाली असल्यास पडलेली व नुकसानग्रस्त फळे गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, ज्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे परिपक्व आंबा फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचे नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवावीत.
आंबा फळाचे गारपिटीपासून रक्षण करण्यासाठी फळांना फोमचे फ्रुटकव्हर घालावे. जेणेकरुन आंब्याला गारपिटीचा फटका बसणार नाही.
ढगाळ आणि दमट हवामानामुळे आंब्याच्या विकसित होणाऱ्या फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ही फवारणी काढणीपूर्वी फक्त एक महिन्यापर्यंतच करावी.
आंबा पिकामध्ये फळे तडकण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यात विद्राव्य बोरॅक्स (बोरॉन) ०.२५% द्रावणाची (२.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. (ही शिफारस विद्यापीठाच्या अनुभवाधारित निष्कर्षांवर आधारित आहे.)
आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळे गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळे वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसेच आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर २ या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत.
ज्या आंबा बागांमध्ये फळे गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत आहेत, तेथे फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी १% पोटॅशियम नायट्रेट (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. फळांच्या वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात.
आंब्याची फळकूज हा काढणी पश्चात प्रमुख बुरशीजन्य रोग असून फळे काढल्यानंतर पिकण्याच्या अवस्थेपर्यंत फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळे कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी फळे काढणीनंतर ५२ अंश से. पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आढीत ठेवावीत.
काजू
विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे परिपक्व काजू बियांची शक्य तितक्या लवकर काढणी करावी व काढलेल्या बिया तात्काळ सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवावे.
काजू बागांमध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे पडलेले काजू गोळा करावेत.
दोन दिवसाआड पक्व काजू बी व बोंडू ची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळे करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावे व नंतर ती उन्हामध्ये ३ दिवस वाळवावी. बीयांची एकसारखी वाळवणी होण्याकरीता दर २ तासांनी बीयांची उलटपालट करावी.
तीन दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बी ची उगवण क्षमता तसेच गराची प्रत चांगली राखण्याकरीता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लास्टीक खोळीमध्ये हवाबंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून कोरडया ठिकाणी ठेवावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.