Fodder camp Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : हिरव्यागार उसाची चाऱ्यासाठी तोड

Team Agrowon

Kolhapur News : ऊसतोडीचा हंगाम संपल्यापासून हिरव्या चाऱ्याची टंचाई पशुपालकांना भेडसावत आहे. हिरवागार ऊस चाऱ्यासाठी तोडला जात आहे. एक-दोन वेळा झालेला पूर्वमोसमी पाऊसदेखील पाणीटंचाईवर मात करू शकला नाही. सध्याची पाणीटंचाई आणि महिनाभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यातील महापुराच्या चिंतेने नदीकाठचा ऊस मोठ्या प्रमाणावर चाऱ्यासाठी विक्री केला जात आहे.

उसाबरोबरच शाळू, भाजीपाला पिके पाण्याअभावी वाया जात आहेत. अशा स्थितीत ओला चारा म्हणून ऊस, शाळू पिके विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे. जमिनीला भेगा पडल्याने शिवाय क्रमपाळीनुसार पाणी लांबत असल्याने पिके धोक्यात आली आहेत. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पाच-सहा तास होणारा पाणीपुरवठा तासाभरावर आला आहे. अशा धोक्याच्या स्थितीत हिरवी पिके चाऱ्याला देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

सध्या पाच ते सहा कांड्या झालेला उसाची पाणीटंचाई आणि महापुराच्या भीतीने विक्री होत आहे. हिरवा चारा तीन हजार रुपये टन दराप्रमाणे खरेदी केला जात आहे. खास करून बारा ते तेरा कांड्या झालेल्या उसाला अधिक मागणी आहे. फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा शेतकऱ्यांना बसू लागल्या आहेत. अशातच ऊस तोडीचा हंगाम संपल्यानंतर हिरव्या चाऱ्यासाठी पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे.

नदीकाठावरील ऊस, गवत, शाळू पिके विक्रीसाठी येत असली तरी त्याचा दर मात्र गगनाला भिडला आहे. अशा स्थितीत पशुपालन करणे नुकसानकारक ठरत आहे. गेल्या पंधरा दिवसांत एक-दोन वेळेचा पूर्वमोसमी पाऊस वगळता मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीची तहान वाढत राहिली आहे. परिणामी, पिके धोक्यात आली आहेत. मोठ्या पूर्वमोसमी पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र सर्वच भागात पावसाची हजेरी अद्याप लागली नाही.

पाऊस पाणी नसल्याने उभी पिके वाचवण्यासाठी शेतकरी हातबल झाला असताना हिरव्या चाऱ्यासाठी पिकांची विक्री करून दोन पैसे हातात मिळतील अशा अशेतून शेतकरी उभी पिके विक्री करू लागला आहे. कमी वाढ झालेल्या उसाची अठराशे ते दोन हजार रुपये टन दराने खरेदी करून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात विक्री करणारी एजंटांची टोळीदेखील यातून सक्रिय झाली आहे.

टनामागे हजार ते बाराशे रुपयांचा निव्वळ नफा मिळवला जात आहे. वेळीच पुरेसा पाऊस झाला नाही तर पंधरा दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर उसाची चाऱ्यासाठी तोड होणार आहे. शिरोळ तालुक्यातील उसावर अवलंबून असणाऱ्या शिरोळ, हातकणंगले, सांगली आणि कर्नाटकातील कारखान्यांनादेखील गाळपाचे उद्दिष्ट साध्य करताना दमछाक होणार आहे. मोठ्या प्रमाणावर उसाची तोड होत असल्याने उसाचे क्षेत्र कमी होणार आहे.

हवामान खात्याने या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज दिल्याने महापुराचीही चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या शिरोळ तालुक्यात ऊस पिकाची चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तोड सुरू आहे.

खरेदी २ हजारांनी; विक्री ३५०० रुपयांनी

शिरोळ तालुक्यातील आठ ते दहा महिन्यांची वाढ झालेला हिरवागार ऊस सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत, विटा या भागांमध्ये साडेतीन हजार रुपये टन या दराने विक्री केला जात आहे.

विहिरींनी तळ गाठल्याने ऊसाला पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. परिणामी, आठ ते दहा महिन्यांचा ऊस चाऱ्यासाठी विक्री करण्याची वेळ आली आहे. अठराशे ते दोन हजार रुपये प्रति टन दराने उसाची विक्री करावी लागत आहे.

- संदीप खामकर, ऊस उत्पादक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT