Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : देशातील निम्म्या जलाशयांत केवळ ४० टक्के पाणीसाठा

Team Agrowon

Pune News : देशातील महत्त्वाच्या जलाशयांपैकी निम्म्या जलाशयांमध्ये ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. दक्षिणेत पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, आंध्र प्रदेशात सरासरीपेक्षा ६८ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ३२ जलाशयांमधील जिवंत पाणीसाठा केवळ ४४ टक्क्यांवर आहे, असे केंद्रीय जल आयोगाने गुरुवारी (ता.१४) प्रसिद्ध केलेल्या आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे.

देशात यंदा पाऊस कमी पडला होता. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशाच्या ६० टक्के भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तसेच मॉन्सूनोत्तर काळात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातही देशात सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे देशातील महत्त्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी झाला. आता उन्हाचा ताप वाढत असताना या जलाशयांमधील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.

केंद्रीय जल आयोगाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक अहवालात देशातील महत्त्वाच्या १५० जलाशयांमधील जिवंत पाण्यासाठीची स्थिती दर्शविली. या जलाशयांमधील जिवंत पाणीसाठा ४० टक्के होता. पाणीसाठ्याची क्षमता १७८ अब्ज घनमीटर असताना पाणीसाठा केवळ ७० अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे.

विशेष म्हणजे मागील हंगामात याच काळातील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ८४ टक्के होता. तर मागील दहा वर्षांतील सरासरीचा विचार केला तर पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ९७ टक्के होता. म्हणजेच यंदा मार्चच्या मध्यातच जलाशयांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला.

२१ टक्के जलाशयांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा कमी साठा

देशातील महत्त्वाच्या १५० जलाशयांपैकी तब्बल ७५ जलाशयांमधील पाणीसाठा ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर २१ जलाशयांमधील पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच ३२ जलाशयांमधील पाणीसाठा ६२ टक्क्यांपेक्षा घटला, असे केंद्रीय जल आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. उन्हाची तीव्रता मार्चपासूनच वाढत असल्याने या जलाशयांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक स्थितीकडे वाटचाल करत आहे.

दक्षिणेत चिंता वाढली

दक्षिण भारतातील राज्यांमधील जलाशयांमधील पाणीपातळी चिंताजनक स्थितीत आहे. अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. विशेषतः बंगळूर शहरात आधीच पाणीटंचाई निर्माण होत आहे. कर्नाटकात पाणीपातळी सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाच्या ४२ जलाशयांपैकी तब्बल ३० जलाशयांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

यापैकी काही जलाशयांमधील पाणीसाठा पुढील दोन आठवड्यांमध्ये आणखी कमी होईल. आंध्र प्रदेशात सर्वाधिक चिंताजनक स्थिती असून सरासरीपेक्षा ६८ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर तमिळनाडूतही २७ टक्के कमी साठा आहे. केवळ केरळमध्ये सरासरीऐवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

महाराष्ट्रात ४४ टक्के साठा

केंद्रीय जलआयोगाने राज्यातील महत्त्वाच्या ३२ जलाशयांमधील पाणीसाठ्याची माहिती दिली. या जलाशयांमध्ये जिवंत पाण्यासाठ्याच्या एकूण क्षमतेपैकी केवळ ४४ टक्के साठा शिल्लक असल्याचे म्हटले आहे. मागील हंगामात याच काळात ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर गेल्या १० वर्षांतील सरासरी पाहिली तर मार्च महिन्याच्या मध्यात पाणीसाठा ४९ टक्के होता, असे केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT