Kharif Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : भात
शेतकरी : सुशांत मोहन नाईक
गाव : वेतोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र : ५ हेक्टर
भात लागवड : दीड एकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोरे (ता. वेंगुर्ला) येथे सुशांत मोहन नाईक यांची पाच हेक्टर शेती आहे. त्यापैकी काही क्षेत्रात आंबा, काजू बाग, तर उर्वरित क्षेत्रात भात पिकासह नाचणी, कणगर, भाजीपाला या पिकांची लागवड केली जाते. दरवर्षी खरीप हंगामात दीड एकरांत पारंपरिक पद्धतीने भात लागवडीचे सुशांत नाईक यांचे नियोजन असते. लागवडीसाठी सुधारित भात वाणांचा वापर केला जातो. सध्या भात रोप पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले असून पुढील नियोजन सुरू आहे.
रोपवाटिका नियोजन
यावर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यामध्ये भात रोपवाटिकेसाठी जमिनीची मशागत करून घेतली. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने जमिनीची मशागत करण्यावर भर दिला जातो. मशागतीवेळी पालापाचोळा गोळा जमिनीची भाजावळ करून घेतली.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाने हजेरी लावली होती. त्यानुसार भात रोपवाटिका आणि अन्य कामांचे नियोजन करण्यास प्राधान्य दिले.
लागवड नियोजनानुसार भात बियाणांचा कालावधी विचारात घेऊन लागवडीसाठी सुधारित भात जातींची निवड केली. साधारणपणे यावर्षी ५ जूनला भात रोपवाटिकेचे काम हाती घेतले. जमिनीची नांगरणी करून भात बियाण्यांची पेरणी केली. पेरणीनंतर ८ ते ९ दिवसांनी रोपवाटिकेतील रोपांना नत्र खताची हलकीशी मात्रा दिली.
भात रोपवाटिकेतील रोपांची लागवडीयोग्य वाढ होण्यास १७ ते १८ दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत पुनर्लागवडीखालील क्षेत्राची नांगरणी केली. संपूर्ण क्षेत्राची साधारण तीन वेळा नांगरणी करून जमीन लागवडीस योग्य तयार केली.
पुनर्लागवड
साधारणपणे २५ जूनपासून भात रोपांच्या पुनर्लागवडीला सुरवात केली. चिखलणीवेळी १९ः१९ः१९ या खताची मात्रा दिली.
पारंपरिक पद्धतीने रोपांची लागवड करताना देखील दोन रोपांमध्ये २० सेंमी पेक्षा अधिक अंतर ठेवण्यात आले आहे. एकाजागी साधारण दोन ते तीन रोपांची लागवड करण्यात आली आहे.
भात लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये आधी सुरण लागवड केली जाते. त्यावेळी शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे नव्याने शेणखताची मात्रा दिली जात नाही.
लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी भात लागवडीतील तण हाताने उपटून घेतली. त्यानंतर युरिया खताचा प्रतिगुंठा प्रमाणे एक डोस देण्यात आला. त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवस लागवड केलेल्या रोपांची वाढ किती प्रमाणात आहे, याची पाहणी करण्यात आली. त्यानुसार खताची मात्रा ठरवून देण्यात आली.
आगामी नियोजन
भात लागवडीखालील जमीन भरड प्रकारातील असल्यामुळे शेताच्या बांधाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. शेतीमध्ये पाणी साचून राहण्यासाठी वेळोवेळी बांधाची बांधणी करावी लागते.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी भात पिकाचे वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल.
भात खाचरात पाण्याची योग्य पातळी नियंत्रित केली जाईल.
आवश्यकतेनुसार तणांचा प्रादुर्भाव जाणून तण उपटून घेतले जाईल.
लागवडीसाठी निवडलेल्या भात बियाणांचा परिपक्वता कालावधी हा १२५ दिवसांचा आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भात पीक कापणीयोग्य होईल.
सुशांत नाईक ९४०५१८४४७८
(शब्दांकन : एकनाथ पवार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.