Raigad News : रायगड जिल्ह्यातील ३५० गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्राच्या अभ्यासासाठी नेमलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या अहवालात याबाबत नोंद करण्यात आली आहे. राज्यभरात सर्वाधिक गावे रायगड जिल्ह्यातील असली तरी सततची जंगलतोड, दगडखाण उद्योग, खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र निश्चित होईपर्यंत जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याची शक्यता असल्याने शाळा, महाविद्यालयात जनजागृतीवर भर दिला जात आहे; मात्र अतिक्रमण, राजकीय हस्तक्षेपामुळे संवेदनशील क्षेत्रे संकटात आली आहेत.
पर्यावरण विभागाने जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. संवेदनशील क्षेत्रात पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या बांधकाम, अतिक्रमण, उद्योगांना सक्त मनाई आहे.
असे असतानाही कर्जत, खालापूर, म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग येथील अनेक गावांतील जमिनी धनिकांनी विकत घेतल्या आहेत. अतिक्रमणामुळे वनपट्टे धोक्यात आले आहेत. संवेदनशील क्षेत्राच्या संरक्षणासाठी मध्यंतरी गावांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये जनजागृती केली जात होती; परंतु ही मोहीम आता पूर्णपणे थंडावल्याचे आदिवासी आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओरड आहे.
संवेदनशील क्षेत्रातील गावांमध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे आर्थिक हितसंबंध गुंतलेले राजकीय मंडळी आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनही नागरिकांना कोणतीच माहिती दिली जात नाही. श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, कर्जत येथील गावांमध्ये आजही बेसुमार उत्खनन सुरू आहे.
माथेरानमध्ये प्रस्ताव मान्य
माथेरानमधील पर्यावरणासंदर्भात नियमांचे बारकाईने पालन केले जाते. त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यात यश आले आहे. मंगळवारी (ता. १) माथेरान संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समितीच्या उपस्थितीत पालिका क्षेत्रातील दोन विकासकामांचा प्रस्ताव मांडण्यात आला,तर एकास मान्यता मिळाली.
४० टक्के जैवविविधता धोक्यात
महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांतील २,२०० गावांमध्ये पश्चिम घाटाचे क्षेत्र पसरले आहे. यात रायगडमध्ये सर्वाधिक ३५० गावांचा समावेश आहे, त्याखालोखाल पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. युनेस्कोने २०१२ मध्ये पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले. पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणावर प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात, ज्या जगात इतर कोठेही आढळत नाहीत. मानवी अतिक्रमणांमुळे येथील ७० टक्क्यांहून अधिक नैसर्गिक अधिवास आधीच नष्ट झाले आहेत तर ४० टक्के जैवविविधता संकटात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.