Agriculture Degree Admission Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Degree Admission : कृषी पदवी अभ्यासक्रमांना ‘प्रवेश घेता का प्रवेश’!

Team Agrowon

Akola News : राज्यात सध्या कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १५ सप्टेंबरपर्यंत विशेष प्रवेश फेरी राबवली जात आहे. विविध कृषी महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी व्यवस्थापनांना यंदा मोठ्या प्रमाणावर कसरती कराव्या लागत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आलेले आहे. ही बाब कृषी शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक असल्याच्या प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.

कृषी शिक्षणाची सोय होण्याचे कारण पुढे करीत गेल्या काही वर्षांत कृषी महाविद्यालयांची खैरात वाटण्यात आली. मात्र त्यापैकी अनेक कृषी महाविद्यालयांत पायाभूत सुविधांची वाणवा आहे. अनुभवी, उच्चशिक्षित प्राध्यापक नसल्याने कंत्राटी शिक्षक हा गाढा ओढत आहेत. शिवाय कृषी अभ्यासक्रमांवर आधारित नोकर भरती होत नसल्याचा एकंदरीत परिणाम आता पुढे येऊ लागला आहे.

आजचे शिक्षण हे प्रामुख्याने नोकरीच्या उद्देशाने घेण्याकडे अधिक कल आहे. त्याचाच फटका कृषी शिक्षणक्रमालाही बसू लागला. गेल्या काही वर्षात कृषी पदवीवर आधारित नोकर भरती अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. महिनोमहिने भरती प्रक्रिया रखडून ठेवली जाते. अनेक पदवी, पदव्युत्तर झालेले विद्यार्थी नोकरभरतीसाठी वर्षानुवर्षे सातत्याने अभ्यास करीत आहेत. परंतु नोकरभरती, रोजगार निर्मितीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आता नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर क्षेत्रातील प्रवेशाकडे अधिक आहे.

त्यामुळे यावर्षी कृषी पदवी शिक्षणक्रमाला प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागते आहे. ज्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळू शकला नाही, असे काही जण आता पर्याय नसल्याने कृषी पदवीकडे येत असल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्याच आठवड्यात स्पॉट अॅडमिशन राऊंड झाला.

यासाठी कृषी महाविद्यालयात या विभागातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आपल्याकडील जागा भरण्याच्या उद्देशाने सर्व तयारीनिशी उपस्थित होते. एक-एक विद्यार्थी आपल्याकडे येण्याच्या उद्देशाने प्रत्येकजण प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळाले. काही महाविद्यालयात कृषी अभ्यासक्रमांच्या जागा अद्यापही रिक्त राहलेल्या आहेत. या जागा भरण्यासाठी अजून पाच दिवस विशेष फेरी चालवली जात आहे. किमान या काळात तरी विद्यार्थी येतील, अशी अपेक्षा महाविद्यालयांचे व्यवस्थापन लावून बसलेले आहेत.

तज्ज्ञांना काय वाटते...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कृषी प्रवेशाच्या मुद्यांवर विद्यार्थी का अनुत्सुक होत आहेत, या बाबतच्या कारणांचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे. कृषी परिषदेचे माजी संचालक जयंतराव महल्ले यांनी या मुद्यावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा करून कारणांचा ऊहापोह करण्याची गरज व्यक्त केली. तर शिक्षण क्षेत्रात वावर असलेले राजेश डवरे यांनीही या मुद्यावर एकंदर सकारात्मक बदल हवे. वरवरची मलमपट्टी नको, असेही ते म्हणाले.

प्रवेशासाठी पत्रके वाटली

या वर्षी सुमारे ४ लाख ७० हजार जणांनी सीईटी दिली होती. कृषी प्रवेशाच्या १८ हजार जागांसाठी यापैकी जवळपास २२ हजार जणांनी कृषी अर्ज केले होते. मात्र, यातीलही अनेक जण गळाले. त्यामुळे या वर्षी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागली. मराठवाड्यातील काही कॉलेज व्यवस्थापनांनी तर अकोल्यात येऊन प्रवेशासाठीची पत्रके वाटली. काही वर्षांपूर्वी ज्या कृषी महाविद्यालयांचे व्यवस्थापन ‘प्रवेश देता येणार नाही’, असे बोलायचे तेच यंदा विद्यार्थ्यांचा शोध घेत फिरताना दिसले. यावरून या परिस्थितीचा निश्‍चितच अंदाज येईल, असेही एका प्राचार्यांनी ‘ॲग्रोवन’सोबत बोलताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT