Pune News: ‘‘गेल्या चाळीस वर्षांपासून शेतीचे प्रश्न आहे तिथेच आहेत. एकीकडे आपण चंद्रावर यान पाठवले, डिजिटल क्रांती केली, अर्थव्यवस्थेत मोठा पल्ला गाठला परंतु आजही शेतीची स्थिती मात्र सुधारली नाही. शेती प्रश्नांमागच्या केवळ कारणांची चर्चा करण्यापेक्षा ते सोडवण्यासाठी नवी व्यूहरचना आणि कृतिशीलता आवश्यक आहे,'' असे मत सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले.
पत्रकार, लेखक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विनय हर्डीकर यांच्या पंच्याहत्तरी पूर्तीनिमित्त `नव्या युगाचे पाईक` या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पिढीची कामगिरी सांगणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन श्री. शिंदे आणि निवृत्त परराष्ट्र सचिव सुधीर देवरे याच्या हस्ते रविवारी (ता. २२) झाले. त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर श्री. हर्डीकर, श्री. देवरे, `विनय हर्डीकर ७५ संयोजन समिती`चे डॉ. राजीव बसर्गेकर, अनंत अभंग, चित्रकार रविमुकुल उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ``स्वातंत्र्यानंतर देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केलेली असली तरी आजही शेतीवर अवलंबून असलेल्या ६० कोटी लोकसंख्येची अवस्था काय आहे? आपल्याच देशाच्या पोटात असलेला हा ग्रामीण भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरेल. या लोकांची प्रगती झाल्याशिवाय देशाचा विकास कसा होईल? शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी गनिमी काव्याने नवी व्यूहरचना आखावी लागेल.``
श्री. देवरे म्हणाले, `` विविध क्षेत्रातील मुशाफिरीतून हर्डीकर यांनी केलेला अफाट लोकसंग्रह आणि संचय केलेले ज्ञान म्हणजे मधाचे पोळे आहे. जग फार गतीने बदलत आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे माहिती आणि ज्ञानाचा पट बदलून जाणार आहे. पुढील २५ वर्षांत कोणती आव्हाने उभी राहतील, याचे आकलन करून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने बुध्दिमत्ता, तंत्रज्ञान, संज्ञापन आणि करूणा यांची सांगड घालावी लागेल.``
`देशमुख आणि कंपनी`च्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. मुक्ता गोडबोले यांनी प्रकाशकीय भूमिका मांडली. अनंत अभंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बसर्गेकर यांनी ग्रंथाची संकल्पना व सहभागी लेखकांविषयी माहिती दिली. सतीश आळेकर, शशांक जेवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. पं. सत्यशील देशपांडे यांनी बंदिश रचना सादर केल्या. समीर दुबळे यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रविमुकुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
धोरण दिरंगाई घातक
विनय हर्डीकर म्हणाले की, बुध्दिमत्ता आणि कर्तबगारी यांची कमतरता नसल्यामुळे स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती झाली. परंतु आपल्याबरोबर स्वतंत्र झालेल्या इतर देशांशी तुलना करता आपल्याकडे अजून पुष्कळ गोष्टी घडलेल्या नाहीत, याची जाणीव होते. धोरणात्मक निर्णय वेळेवर झाले नाहीत, काही गोष्टींची अंमलबजावणी धड झाली नाही, त्यामुळे आपण मागे पडलो. धोरण दिरंगाई आणि धोरण लकवा हे आजचे प्रमुख प्रश्न आहेत. त्यावर मात करण्यासाठी राजकीय उत्तरे शोधावी लागतील. व्यवस्था आता इतक्या जाड कातडीची होत आहे की, व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्थेवर प्रभाव टाकता येईल, या दृष्टिकोनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.