अमरावती : कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Business)शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सावरण्यास पूरक ठरला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असताना या क्षेत्राशी संबंधित अडचणी दूर करण्याची मागणी अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनने (Amaravati poultry Farmers Assosiation) पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil)यांच्याकडे केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेत अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात नदीच्या काळात अमरावती जिल्हा हा पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून नावारूपास आला आहे.
मोठ्या संख्येने शेतकरी या शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. हा शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकरी आपल्याच शेतात शेडची उभारणी करतात. मात्र अशा बांधकामांवर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कर आकारला जातो.
ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यास त्याचाही फटका पोल्ट्री व्यवसायिकांना बसतो. अवाजवी कराची मागणी अनेकदा केली जाते. पोल्ट्री व्यवसाय शेतातूनच केला जात असल्याने त्याला शेती उत्पन्न म्हणून करातून माफी मिळावी बांधकामावर कर आकारला जाऊ नये.
पोल्ट्री व्यवसायिकांना तेलंगणा सरकारने वीज बिलामध्ये सवलत देण्याचे धोरण अवलंबले आहे. या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी. पशुखाद्याच्या दरात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लावणे अवघड झाले आहे.
ही बाब लक्षात घेता पोल्ट्री व्यवसायिकांना आधारभूत किमतीमध्ये तांदूळ, गहू, मक्का, बाजरा, मोहरी याची उपलब्धता करून द्यावी. हा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सातत्याने अडचणी वाढत आहे. परिणामी, वैयक्तिक स्तरावर असा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.
करारावर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दुसरीकडे वाढत आहे. मात्र करार पोल्ट्री व्यवसायात कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी शासनाने हा शेतीपूरक व्यवसाय वाचविण्यासाठी नवीन धोरण आखण्याची गरज पोल्ट्री फार्मर्सकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. पोल्ट्री खतदेखील त्यामध्ये प्रभावी माध्यम ठरणार असल्याने पोल्ट्री खताचा वापर वाढावा यासाठी सरकार पातळीवर जाणीव जागृतीसाठी पुढाकार घेतला जावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या वेळी अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे डॉ. शरद भारसाकळे, बाबासाहेब रावणकर, शुभम महल्ले, अतुल पेरसपुरे, आकाश खुरद, शिवाजी पवार, रवींद्र मेटकर, गिरीश घाटोळ, विजू पुंड, राजेंद्र मामनकर उपस्थित होते.
अफवांचा व्यवसायाला फटका
जनावरांशी संबंधित काही आजार कोंबड्यांना होत नसताना देखील ते होत असल्याचा अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. कोरोना आणि आता ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या काळात हे अनुभवण्यात आले. त्याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतो. अंडी आणि चिकनची मागणी घटल्याने दर कोसळतात. ही बाब लक्षात घेता असा अपप्रचार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही असोसिएनने केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.