Raigad News : कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरण बांधून पूर्ण झाले असून दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते, परंतु धरणातील पाणी शेतीसाठी वापरता येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. धरणातील पाणी शेतीला सोडण्यासाठी ज्या कालव्यांची आवश्यकता आहे, ते कालवे पाटबंधारे विभागाने अद्याप न बांधल्याने भातशेतीसह भाजीपाला लागवड, फळ लागवडीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही.
धरणातून कालवे काढल्यास आजूबाजूच्या गाव-वाड्यांची तहान ही भागू शकणार आहे. मात्र कालवे बांधण्यासाठी आवश्यक जमीन संपादन तथा अधिग्रहणाची प्रक्रिया रखडल्याने शेतीसाठी धरणातील पाण्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे पाली-भुतिवली धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
धरणाच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी परिसरात उभारलेल्या मोठमोठ्या गृहसंकुलांना पर्यायाने बिल्डर लॉबीला होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. लघुपाटबंधारे विभागाने याप्रकरणी दखल घेत कालव्यांची कामे लवकरात लवकर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मध्यंतरी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, कर्जत तालुक्याचा दौरा केला, तेव्हा रेल्वे पट्ट्यातील पाली-भुतिवली धरणाचीही पाहणी केली होती.
दौऱ्यानंतर कर्जत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी, शेती ओलिताखाली यावी यासाठी धरण बांधले होते, धरणात १५ वर्षांपासून पाणी साठत असले तरी अद्याप शेतीसाठी सोडण्याबाबत नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे १५ गावांतील १,१०० हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली नाही. शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी कालव्याची कामे वर्षभरात पूर्ण करण्याच्या सूचना सरकारला करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. मात्र त्यानंतरही पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम सुरू न केल्याने अद्याप शेतीला मुबलक पाणी मिळू शकलेले नाही.
काही महिन्यांपूर्वी प्रत्येक धरणाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीर वस्ती आहे, त्यांना काही महिन्यांपूर्वी नोटिसा देऊन स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र रहिवाशांनी विरोध दर्शविल्याने उर्वरित धरणातील कालव्याची कामे रखडली आहेत.- भरत गुंटूरकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, कर्जत
कर्जत-नेरळदरम्यान भिवपुरी गावाजवळ पाली-भुतिवली धरण असून २००३ मध्ये धरणावर मुख्य बांध घातल्याने साठा वाढला आहे. शेती सिंचनाखाली येण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्यांची कामे करणे अपेक्षित होते, मात्र ती न झाल्याने शेतीला पाणीच मिळू शकलेले नाही आणि ३५ दशलक्षघनमीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते.
पाली-भुतिवली धरणातून कालवे काढण्याच्या मार्गात जी लोकवस्ती आहे त्या संदर्भात नियोजन समिती अहवाल तयार करणार आहे. कालव्याचे काम प्राधान्याने पूर्ण करून आजूबाजूच्या गावांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येईल. वर्षोनुवर्षे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.- महेंद्र थोरवे, आमदार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.