Orange
Orange Agrowon
ताज्या बातम्या

Orange Pest : संत्र्यावर ‘लाल कोळी’च्या प्रादुर्भावाने उत्पादक हवालदिल

Team Agrowon

Orange Pest Outbreak बुलडाणा ः जिल्ह्यात मराठवाड्याला लागून असलेल्या लोणार तालुक्यात काही ठिकाणी संत्रा बागांमध्ये (Orange Orchard) लाल कोळी (Red Mite Outbreak) (रेड माईट) या किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

फळे तोडणीला आली तेव्हा त्यावर मोठमोठे डाग दिसून येत आहेत. फळांची चकाकी गायब झाली. दर्जा घसरल्याने या फळांना कोणीही घेईना.

परिणामी, शेतकऱ्यांनी मृग बहराच्या व्यवस्थापनावर (Orange Blossom Management) केलेला खर्च निघण्याची शाश्‍वती राहिलेली नाही.

लोणार तालुक्यात कारेगाव व परिसरात संत्रा बागा आहेत. या बागांमध्ये मृग बहर शेतकऱ्यांनी धरला आहे. फळे लहान आकाराची असताना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत लाल कोळी किडीने प्रादुर्भाव केला होता.

त्याचे प्रतिकूल परिणाम फळांवर दिसत आहेत. मृग बहराची फळे लवकरच काढणीसाठी तयार होत आहेत. काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये १५ दिवसानंतर तोडणी सुरू झाली असती. यंदा हा बहर मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत चांगला आला होता.

त्यामुळे मागील उत्पन्नातील तोटा भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

आता फळे रंगतदार होऊन परिपक्व होण्याची अवस्था सुरू असतानाच कारेगाव परिसरातील बागांमध्ये लाल कोळीने केलेल्या नुकसानीचे परिणाम स्पष्ट दिसून येऊ लागले आहेत. फळांवर जागोजागी डाग तयार झाले.

काही बागांमध्ये ९० ते १०० टक्क्यांपर्यंत हे नुकसान झाले आहे. काही बागांमध्ये वेळेवर तेव्हा व्यवस्थापन झाल्याने बागांमधील फळे वाचू शकली. या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

दोन दिवसांपूर्वी बुलडाणा ‘केव्हीके’चे तज्ज्ञ, तालुका कृषी अधिकारी व चमूने लोणार भागात बागांची पाहणी केली. त्यांनाही तेथे ‘रेड माइट’च्या प्रादुर्भावाची लक्षणे स्पष्टपणे दिसून आली.

लाल कोळीच्या प्रादुर्भावामुळे माझ्या सात एकरातील बागेमध्ये फळांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारोंचा खर्च करून आता उत्पादनाला फटका बसला. काळी झालेली फळे तोडून टाकली आहेत. याचे सर्वेक्षण होऊन मदत मिळावी, अशी आमची संत्रा उत्पादकांची मागणी आहे.

- विठ्ठलराव गायकवाड, संत्रा उत्पादक, कारेगाव, ता. लोणार, जि. बुलडाणा

‘व्यवस्थापनाचा वेळीच दिला सल्ला’

‘‘लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्या भागात मृग बहराच्या फळांवर नोव्हेंबर ते मार्च यादरम्यान आढळून येतो. ही कीड फळांतील रस शोषण करते. तेथे फळाच्या सालीत जाडसरपणा तयार होऊन रंग तपकिरी तयार होतो.

याला काही शेतकरी ‘लाल्या’ असे संबोधतात. लाल कोळी व्यवस्थापनासाठी नोव्हेंबरपासूनच सल्ला दिला होता. शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवण्यात आली होती.

रस शोषण केलेल्या फळाची गुणवत्ता खराब होऊन प्रत खालावते. आता अशी फळे जमिनीत गाडावी व शिफारशीत कोळीनाशकाची दोन वेळा १५ दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.

ज्यामुळे पुढील हंगामात प्रादुर्भाव रोखता येईल, असा सल्ला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पातील सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे यांनी दिला.

मृग बहराची फळे मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येतात. फळे हरभरा आकाराची असतात तेव्हा थंडीचा जोर वाढलेला असतो. त्या काळात लाल कोळीसाठी पोषक वातावरण मिळते. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढते.

फळे लहान असताना हा कोळी रस शोषून घेतो तेव्हा त्याची तीव्रता दिसून येत नाही. मात्र फळे मोठी व्हायला लागली, की हा डाग दिसून येतो. आम्ही भेट दिली तेव्हा चार बागांमध्ये ९० टक्के नुकसान दिसले. काही बागांत ४० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला. ज्यांनी सुरुवातीला व्यवस्थापन केले, त्या बागा चांगल्या आहेत.

- डॉ. अनिल तारू, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT