
जळगाव ः खानदेशात कांद्याची (Onion Cultivation) सुमारे १३ हजार हेक्टरवर झाली आहे. काढणी सप्टेंबरअखेर व ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होईल. परंतु कांद्याचे दर (Onion Rate) चार-पाच महिन्यांपासून दबावात आहेत. तसेच अधून मधून घसरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
अधिक आवकेमुळे दरावर मार्चमध्येच परिणाम झाला. यामुळे या किंवा खरिपात कांदा लागवड कमी होईल, असे सांगितले जात होते. खानदेशात खरिपात सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवर कांदा पीक असते. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये लागवड केली जाते. तसेच काही शेतकऱ्यांनी यंदा जुलैतच लागवड केली आहे. अधिक किंवा सुरवातीच्या दरांचा लाभ होईल, असा कयास त्यामागे आहे.
खानदेशात कांदा लागवडीसाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यात लागवड अधिक असते. तेथे सुमारे ८ हजार हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. नंदुरबारातही सुमारे दीड हजार हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे. धुळ्यातील लागवड बऱ्यापैकी आहे. पण तेथेही कमी दर व वाढता खर्च यामुळे लागवडीत घट झालेली आहे. कांदा लागवड जुलैच्या सुरवातीलाच काही भागांत सुरू झाली. जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा ते साडेसहा हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित होती.
जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव या तालुक्यांत लागवड झाली आहे. धुळ्यातील शिंदखेडा, साक्री भागात लागवड अधिक आहे. धुळे तालुक्यातील कापडणे, देवभाने, लामकानी, कुसुंबा आदी भागात अधिक लागवड झाली आहे. कांद्याची लागवड यंदा खर्चिक ठरली आहे. कारण बियाण्याचे दर यंदा प्रतिकिलो १०००, १२०० ते २००० रुपयांपर्यंत होते. महागडे बियाणे व लागवड खर्च यामुळे खर्च अधिकचा आला आहे. लागवडीसाठी एकरी चार ते साडेचार हजार रुपये एवढा खर्च आला आहे. लागवडीला ऑगस्टच्या मध्यात वेग आला. लाल कांद्याची लागवड अधिक झाली आहे. नंदुरबारात अक्कलकुवा, शहादा भागांत पांढऱ्या कांद्याची लागवड काही कंपन्यांच्या मदतीने झाली आहे. यंदा अतिपावसात कांदा रोपांचे नंदुरबार व धुळ्यातील साक्री भागात नुकसान झाले.
नेत्यांनी दरासाठी मोहीम हाती घ्यावी
अनेकांनी उन्हाळ्यात कांदा फेकून दिला. अनेकांचा कांदा चाळीतच खराब होत आहे. मातीमोल दर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिमतीने लागवड केली आहे. चांगले दर मिळण्यासाठी शासनाने योग्य धोरण, कार्यवाही करावी, लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आवाज उठवावा, पक्षीय राजकारण दूर ठेवावे व कांदा उत्पादकाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी नेते कडूअप्पा पाटील यांनी म्हटले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.