
जळगाव ः खानदेशात मे अखेरीस व पाच जूनपर्यंत लागवड केलेल्या कापूस पिकात बोंडे उमलत (Cotton Production) आहेत. अनेक शेतकऱ्यांचे अतिपावसात कापसाचे नुकसान (Cotton Crop Damage) झाले. परंतु अशा स्थितीतही शेतातला कापूस घरात आणण्याची धावपळ, सर्कस शेतकरी करीत आहेत. त्यासाठी मजुरीदेखील (Cotton Harvesting Wages) अधिकची द्यावी लागत आहे. कापूस वेचणी सहा रुपये प्रतिकिलो आहे. तर सात तास कामासाठी १५० रुपये रोज अशी मजुरीदेखील लागत आहे.
खानदेशात मंगळवारी (ता. २०) अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. यामुळे सकाळी १० पासून कापूस वेचणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले. मिळतील तेथून मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली. कारण पावसाने कापसाचे सतत नुकसान होत आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी शेतातील कापूस घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
सहा रुपये प्रतिकिलो, या दरात काही भागांत कापसाची वेचणी करण्यात आली. मजूर कमी असल्याने वेचणी व इतर शेतीकामे रखडतच सुरू आहेत. कापूस वेचणीसठी १५० रुपये रोजगारही घेतला जात आहे.
एक मजूर दिवसभरात १० ते १२ किलो कापसाची वेचणी करीत आहे. तर सहा रुपये प्रतिकिलो या मजुरी दरात एक मजूर १२ किलोपेक्षा अधिकची कापूस वेचणी करीत आहेत. कारण यात जेवढी वेचणी करता येईल, तेवढी अधिक मजुरी मिळते. कापसात ओलावा असल्याने मजुरी दर अधिक पडत आहेत. कारण वेचणीनंतर कापूस वाळवून घ्यावा लागत आहे. त्यात आर्द्रता कमीत कमी असावी, असा शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
कारण अधिक ओलाव्याच्या कापसाला दर कमी मिळतात. कापूस वेचणी आता पुढे दिवाळीपर्यंत सतत सुरू राहील. स्वच्छ सूर्यप्रकाशीत किंवा चांगले ऊन पडल्यास कापसात बोंडे उमलण्याचे प्रमाण वाढेल. तसेच त्याचा दर्जाही चांगला राहील. यामुळे शेतकरी कोरड्या, सूर्यप्रकाशीत वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. मजूरटंचाई अधिकची राहील, असेही संकेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.