
१) टप्प्याटप्प्याने लागवड: केळी लागवड फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने करून दरातील चढउतारावर नियंत्रण.
२) ऑटोमेशनचा अवलंब: ठिबक सिंचन + ऑटोमेशनमुळे खत आणि पाण्याची मोठी बचत.
३) पीक फेरपालट आणि हिरवळीची पिके: जमिनीची सुपीकता राखण्यासाठी धैंचा, तूर, धना, पपई यांचा समावेश करावा.
४) माती व पाणी व्यवस्थापन: खोल नांगरणी, जमीन तापवणे आणि फिल्टरद्वारे पाण्यातील क्षार नियंत्रण.
५) मर्यादित व नियोजित खत वापर: ह्युमिक ॲसिड, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि शिफारस केलेली आळवणी वेळोवेळी.
Jalgaon: निंबोल (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात जितेंद्र पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची २०० एकर काळी कसदार जमीन आहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून जितेंद्र शेती करीत आहे. केळी प्रमुख पीक असून मका, कापूस, हळद या पिकांची लागवड केली जाते. रब्बीत मका, हरभरा, गहू ही पिके घेतली जातात. केळीमध्ये मुख्यतः मृग (जून, जुलैत लागवड) बाग घेतली जात असे. परंतु अलीकडे टप्प्याटप्प्याने बारमाही केळी लागवड करतात.
फेब्रुवारी महिन्यापासून लागवडीस सुरुवात होते. लागवड टप्प्याटप्प्याने केल्यामुळे बाजारातील दरांमध्ये होणाऱ्या चढउताराचा प्रभाव कमी करण्यात यश मिळाले आहे. केळी लागवडीमध्ये जितेंद्र यांचे काका भागवत विश्वनाथ पाटील, वडील जगन्नाथ पाटील, काका संजय पाटील, बंधू राजेंद्र पाटील आदींचे मार्गदर्शन मिळते. केळी पिकामध्ये प्रभावी सिंचन आणि खत व्यवस्थापन होण्याकरिता ऑटोमेशन यंत्रणेचा वापर केला आहे. तसेच बागेत पीक फेरपालटीसह हिरवळीच्या पिकांच्या लागवडीवर भर दिला जातो, असे जितेंद्र पाटील सांगतात.
लागवड
लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित ग्रॅण्ड नैन वाणाच्या केळी रोपांचा उपयोग केला जातो. संपूर्ण लागवड गादीवाफ्यावर केली जाते. त्यासाठी १० इंच उंचीचे आणि साडेतीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले जातात. त्यावर सिंचनासाठी सिंगल लॅटरलचा वापर केला जातो. गादीवाफ्यावर साडेपाच बाय साडेपाच फूट अंतरावर केळी रोपांची लागवड केली जाते. जमीन सुपीकतेसाठी तूर, धैंचा, धना, पपई ही पिके घेतली जातात.
पीक फेरपालट
दर्जेदार उत्पादनासाठी जमीन सुपीकतेकडे विशेष लक्ष दिले जाते. एकाच क्षेत्रात सतत केळी, कापूस व अन्य पिकांची लागवड करणे टाळले जाते. पीक फेरपालट करण्यावर भर दिला जातो. लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोल नांगरणी केली जाते. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. पाण्याचा निचरा होण्याची क्षमताही वाढते. जमिनीत सेंद्रिय घटकांची उपलब्धता देखील वाढीस लागण्यास मदत होत असल्याचे जितेंद्र पाटील सांगतात.
जमीन तापू देण्यावर भर
केळी व कापूस लागवडीसाठी नियोजित क्षेत्र लागवडीपूर्वी खोल नांगरणी करून उन्हामध्ये तापू दिले जाते. त्यामुळे कीड-रोगांच्या अवस्था जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन नष्ट होण्यास मदत होते. जमीन चांगली भुसभुशीत केल्यानंतर एकरी तीन ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत मिसळले जाते. पीक फेरपालट करून जमीन तापू दिल्यानंतर लागवडीचे नियोजन केले जाते. खोल नांगरणीमुळे मातीच्या थरांची उलथापालथ होते. त्याचा फायदा होतो.
ऑटोमेशन यंत्रणेचा अवलंब
संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यात ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा अवलंबिले आहे. सिंचनासाठी १६ मिमी लॅटरल वापरली जात असून त्यातून ताशी तीन लिटर इतका पाण्याचा विसर्ग होतो. दोन ड्रीपमध्ये सव्वाफूट एवढे अंतर राखले जाते. रासायनिक खतांचा वापर ठिबकद्वारे केला जातो. ऑटोमेशन यंत्रणेचा अवलंब केल्यामुळे खतांचा कार्यक्षम उपयोग होतो. शिवाय पाण्याचा देखील मर्यादित वापर करता येतो.
या माध्यमातून रासायनिक खते व पाण्याची बचत होण्यास मदत झाली आहे. सिंचनाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे ठिबकचे ड्रीप बंद होणे, जमिनीत क्षार वाढणे अशा समस्या दिसून येत होत्या. त्यासाठी सिंचनाच्या पाणी स्त्रोतांमधील पाण्याचे परिक्षण करून घेतले. त्यातून पाण्यामध्ये क्षारांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊन कूपनलिकांना विविध प्रकारचे फिल्टर बसवून घेतले आहेत. यामुळे ड्रीप बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले.
हिरवळीच्या पिकांची लागवड
केळी लागवड नियोजनानुसार बागेच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेने धैंचा लागवड केली जाते. धैंचामुळे पिकामुळे केळी रोपांना सुरुवातीच्या अवस्थेत नैसर्गिक सावली मिळते. तसेच धैंचा पीक पावसाळ्यात तयार झाल्यानंतर बागेतील सरीमध्येच गाडला जातो. त्यामुळे पिकास हिरवळीचे खतही उपलब्ध होण्यास मदत मिळते.
मर्यादित खत वापराला प्राधान्य
नियोजित केळी लागवड क्षेत्रात चांगले कुजलेले शेणखत मशागत केली जाते. त्यानंतर गादीवाफे तयार करून सिंगल सुपर फॉस्फेट खताचा बेसल डोस दिला जातो.
पीक एक महिन्याचे झाल्यानंतर पोटॅश, डीएपी, युरिया या रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. प्रति एक हजार झाडांना ही मात्रा दिली जाते. ही खतमात्रा पीक चार महिन्यांचे होईपर्यंत देण्यात सातत्य राखले जाते.
मुळांच्या वाढीसाठी पीक एक महिन्याचे झाल्यानंतर ह्युमिक ॲसिड ड्रीपद्वारे योग्य प्रमाणात दिले जाते.
केळी निसवणीच्या अवस्थेत आल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाते.
लागवडीनंतर बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत घटकांची आळवणी करण्यावर भर दिला जातो. यामुळे रोपांची सेटिंग चांगली होण्यास मदत होते. लागवडीनंतर पाचव्या, बाराव्या व बाविसाव्या दिवशी ही आळवणी केली जाते.
त्यानंतर ड्रीपमधून सर्व खते दिली जातात. आठवड्यातून एक वेळ पोटॅश, युरिया, मॅग्नेशिअम सल्फेट तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या प्रति एक हजार झाडांना मात्रा दिल्या जातात.
१) केळी शेतीत ऑटोमेशनचे फायदे काय आहेत?
ऑटोमेशनमुळे पाणी आणि खतांचा अचूक वापर होतो, ज्यामुळे संसाधनांची बचत आणि पीक उत्पादन वाढते.
२) शेतात कोणती पिके फेरपालटीसाठी वापरली जातात?
तूर, धैंचा, धना आणि पपई यांचा वापर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी केला जातो.
३) लागवडीपूर्वी खोल नांगरणी का महत्त्वाची आहे?
खोल नांगरणीमुळे मातीची हवा खेळती राहते, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि किडींचा नाश होतो.
४) ठिबक सिंचन संसाधन बचतीस कसे मदत करते?
ठिबक सिंचन पाणी आणि खते थेट मुळांना पुरवते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि खतांचा कार्यक्षम उपयोग होतो.
५) धैंचासारख्या हिरवळीच्या पिकांची भूमिका काय आहे?
धैंचा नैसर्गिक सावली पुरवतो आणि वाढल्यानंतर जमिनीत मिसळून सेंद्रिय खत म्हणून सुपीकता वाढवतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.