Nanded Farmers : नांदेड जिल्ह्यात खरीप पेरणी जवळपास पूर्ण झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. २९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ११५ मिलिमीटर पावसाची तूट असून, आतापर्यंत केवळ ८१.७७ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचा खंड वाढल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, अनेक भागांत पिके करपू लागली आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सरासरी ७ लाख ६१ हजार ५७४ हेक्टर क्षेत्र असून, आजअखेर ७ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. सरासरी क्षेत्राच्या ९७.४० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक ४ लाख ६१ हजार ५०९ हेक्टर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची ११०.४० टक्के, तर कापसाची ८८.३४ टक्के पेरणी झाली आहे.
मात्र, पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडदासह खरीप पिकांवर ताण वाढला आहे. हलक्या जमिनीतील पिकांना पाण्याची कमतरता अधिक जाणवत आहे. पिकांची वाढ खुंटण्याबरोबरच पाने कोमेजून करपू लागल्याचे चित्र अनेक भागांत दिसत आहे.
जिल्ह्यात १ जून ते २९ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष ५१६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीतील अपेक्षित सरासरी ६३१ मिलिमीटर असून, पावसाची तूट ११५ मिलिमीटर आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७८३.६० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची पावसाची स्थितीही लक्षणीय कमजोर आहे.
जिल्ह्यातील पावसाची स्थिती तालुकानिहाय असमान आहे. १ जूनपासून २९ ऑगस्टपर्यंत किनवटमध्ये ६९८.६० मिलिमीटर, माहूरमध्ये ६८५.६०, उमरीमध्ये ५०७.४०, तर नांदेड तालुक्यात ४७६.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत बहुतांश तालुक्यांत पावसाची कमतरता आहे.
किनवटमध्ये याच कालावधीसाठी अपेक्षित ७६२.१० मिलिमीटरच्या तुलनेत ६९८.६० मिलिमीटर पाऊस झाला असून, ६३.५० मिलिमीटर तूट आहे. नांदेड तालुक्यात अपेक्षित ५८५.९० मिलिमीटरच्या तुलनेत ४७६.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
मागील वर्षी २९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ७८३.६० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ५१६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण लक्षणीय कमी आहे. त्यामुळे पावसाच्या पुढील आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा
सध्या खरीप पिके वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असल्याने पावसाची नितांत गरज आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधून-मधून हलका पाऊस होत असल्याने खरीपाची पिके तग धरून आहेत. सध्या पिकांची परिस्थिती बरी असली तरी यापुढे पाऊस झाला नाही, तर मात्र बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते.- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.