Drought Scare : नाशिक जिल्ह्यात खरीप पेरणीने सरासरी क्षेत्राचा टप्पा ओलांडला असला, तरी पेरणीनंतर पिकांना पोषक पाऊस न मिळाल्याने आता खरीप हंगामावर दुष्काळसदृश संकटाची छाया गडद होत आहे. राज्यात एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे वितरण विस्कळीत झाले असून, पश्चिम घाटमाथा आणि काही तालुके वगळता पूर्व भागात पावसाची तूट कायम आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने उशिराने झालेल्या पेरण्या आता कशाबशा ओलाव्यावर तग धरत आहेत. तर अनेक ठिकाणी पिके जगविण्यासाठी संरक्षित पाणी द्यावे लागत आहे..२७ ऑगस्टअखेर जिल्ह्यात खरिपाची ६ लाख ४६ हजार ८८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १००.९९ इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात तालुकानिहाय मोठी तफावत दिसून आली आहे. चांदवडमध्ये सर्वाधिक ११४ टक्के पेरणी झाली आहे. याशिवाय दिंडोरी, सिन्नर, देवळा, मालेगाव, येवला, नाशिक तालुक्यात शंभर टक्के पेरा झाला आहे. तर बागलाण, इगतपुरी, कळवण, नांदगाव, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेरणी सरासरीच्या आसपास आहे. एकीकडे पाऊस वेळेवर नसल्याने पेरणी खोळंबली होती. ती टप्प्याटप्प्याने झाली. आता वाढीच्या अवस्थेत पावसाळी पिके व्हेंटिलेटरवर आहेत. पिके कोमेजू आहे..Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर.जिल्ह्यात मक्याला शेतकऱ्यांनी मोठी पसंती दिली आहे. मक्याची पेरणी ३ लाख ५ हजार हेक्टरवर झाली आहे. सरासरी पेरणीच्या १२९ टक्के क्षेत्रावर ती पूर्ण झाली आहे. तर जवळपास एकूण पेरणी क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रावर हे पीक आहे. याशिवाय १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. तर भात उत्पादक पट्ट्यात टप्प्याटप्प्याने लागवड होऊन ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी ही अन्नधान्य पिके आहेत. तर तूर, मूग, उडीद ही कडधान्य पिके असून, गळीत धान्य पिकांचे क्षेत्र तुलनेने कमी आहे. मात्र, सध्या पावसाने दडी मारल्याने प्रामुख्याने मका व सोयाबीनच्या पिकांना उन्हाचा ताण जाणवू लागला आहे..पूर्वेकडील तालुक्यांत पाऊस कमीचजून ते २९ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात ६००.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या ८१.९ टक्के आहे. पश्चिमेकडील तालुक्यांत पाऊस समाधानकारक असला, तरी पूर्वेकडील तालुक्यांत पावसाची कमतरता आहे. इगतपुरीत सरासरी २५७०.९ मिलिमीटरच्या तुलनेत केवळ ११५०.७ मिलिमीटर पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पावसाचा भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येथे सरासरीच्या ४४.८ टक्के पाऊस झाला आहे. येवला, नांदगाव, मालेगाव, सिन्नर तालुक्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे..Rainfall Deficit: तूर खुंटली, कपाशी काळवंडली, सोयाबीन करपले.उत्पादनात घट होण्याचा धोकाऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २४९ मिलिमीटर असताना २९ ऑगस्टअखेर केवळ १२५.२ मिलिमीटर म्हणजे सुमारे ५०.१ टक्के पाऊस झाला आहे. पेरण्या अनेक ठिकाणी उशिरा झाल्यानंतर आता पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीतील मका, सोयाबीन आणि अन्य खरीप पिकांना ओलाव्याचा ताण जाणवू लागला आहे. पूर्व भागात ही परिस्थिती अधिक गंभीर असून, पुढील पावसावर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची पेरणी शंभर टक्क्यांवर पोहोचली असली, तरी ‘पेरणी सरासरीपार म्हणजे हंगाम सुरक्षित’ असे समीकरण राहिलेले नाही. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाचा खंड कायम राहिल्यास उत्पादनात घट होण्याचा धोका आहे..दृष्टिक्षेपात...मका, सोयाबीनसारखी पिके पाण्याअभावी कोमेजली.मका पिकात तुरा निघून गेल्याने एकरी उत्पादकता घटण्याची शक्यता.खरीप व लेट खरीप हंगामातील कांदा रोपांची वाढ खुंटली.कमी पावसामुळे विहिरींवरील पाण्याने तुषार सिंचनाद्वारे ओलीत करण्याची धावपळ.काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे; पण वीजपुरवठा नसल्याने पिके करपली..सध्या बऱ्याचशा पिकांनी ऊन धरायला सुरुवात केली आहे. पुढील आठ-दहा दिवसांत पाऊस झाला नाही, तर ही पिके पूर्णपणे करपून जळून जाण्याची शक्यता आहे. मका, बाजरी, भुईमूग आणि कपाशी यांसारखी वरच्या पाण्यावर असलेली पिके सध्या पाण्याअभावी करपायला आणि वाळायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केलेला खर्च आणि मेहनत वाया जाण्याची भीती आहे.- विनोद जाधव, शेतकरी, सातमाने, ता. मालेगाव.विस्कळीत पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मका पिके हिरवीगार दिसत असली, तरी अपेक्षित वाढ आणि उत्पादन झालेले नाही. त्यामुळे यंदा मक्याचे सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघेल की नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच पावसातील खंडाचा मुगाच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी मुगाची वाढ खुंटली असून, अपेक्षित प्रमाणात शेंगा लागलेल्या नाहीत. त्यामुळे मुगाच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.- जनार्दन कमोदकर, शेतकरी, कोळगाव, ता. येवला.मोठ्या प्रमाणात पावसात खंड पडला आहे. खरीप हंगामाची पिके चांगली असली, तरी त्यांना आता जास्त पाण्याची गरज आहे. परिसरात पाणी कमी पडल्याने शेतकरी विविध प्रकारे पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत.- सचिन होळकर, शेतकरी, लासलगाव, ता. निफाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.