
NCP Agriculture minister : राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण खातेवाटपाचा तिढा बरेच दिवस सुटत नव्हता. अखेर अजित पवारांच्या दिल्लीवारीनंतर राज्यात खातेवाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीला झुकते माप देत अर्थ, कृषी, सहकारसारखी महत्वाची खाती देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून राजकारणात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी राज्यात चारवेळा मुख्यमंत्री तसेच केंद्रात संरक्षण मंत्रालयासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. परंतु कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडल्यानंतर ते केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी झाले. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांमनी स्वतःहून कृषी मंत्रालय मागून घेतले. देशाचे कृषिमंत्री म्हणून त्यांची दहा वर्षांची कारकीर्द गाजली. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाच्या किमा आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ, पणन सुधारणा यांसारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप सरकारच्या पराभवानंतर १९९९ पासून सलग १५ वर्षे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीचे सरकार राहिले. परंतु राज्यात सत्ता वाटपाच्या समीकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला कृषिमंत्रीपदाने कायम हुलकावणी दिली.
महाराष्ट्र हे शेती क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य आहे. थेट जनतेशी संबंधित खाते म्हणून कृषी खात्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी कृषी खात्याची धुरा संभाळली आहे.
१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून राज्यात युती आणि आघाडीच्या सरकारांचे पर्व सुरू झाले. आघाडी आणि युतीच्या राजकारणात ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाकडे कृषी खाते राहिले आहे.
युती सरकारमध्ये शिवसेनेचे शशिकांत सुतार कृषिमंत्री होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
शरद पवारांनी १९९९ मध्ये काॅंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या ६ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेससोबत जाऊन आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये काॅंग्रेसचे रणजित देशमुख, रोहिदास पाटील कृषिमंत्री होते. त्यानंतर २००३ ते २००५ या काळात गोविंदराव आदिक यांच्याकडे कृषिमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.
त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी केंद्रात शरद पवार हे कृषिमंत्री होते. या जोडीने राज्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
आदर्श घोटाळ्यानंतर पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आली. विखे-पाटील यांनी यापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातही कृषिमंत्री म्हणून काम केले होते. त्यावेळी ते शिवसेनेत होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, चंद्रकांत पाटील आणि अनिल बोंडे अशी कृषिमंत्रीपदाची संगीतखुर्ची झाली.
त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षे चाललेल्या या सरकारमध्ये दादाजी भुसे यांनी कृषी खात्याचा कारभार सांभाळला. त्यांची कारकीर्दही वादग्रस्त ठरली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यांनी अब्दुल सत्तार यांना कृषिमंत्रीपदाची संधी दिली. परंतु स्फोटक विधाने, शिवराळ भाषा, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विविध कारनाम्यांमुळे सत्तार यांनी अनेक वाद ओढवून घेतले. त्यांच्या कार्यकाळात कृषी खात्याच्या अधोगतीने आणखी वेग पकडला.
अजित पवार गटाच्या बंडानंतर आकाराला आलेल्या नवीन सत्ता समीकरणात सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्या हाती आता कृषी खात्याचे शिवधनुष्य देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीमधील तरुण आणि आक्रमक नेता म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते. त्यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने विविध आरोप केल्यामुळे मध्यंतरी त्यांची प्रतिमा डागाळली होती.
त्यांचे चुलते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून तर केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी कृषीमंत्री पदाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना चालून आली आहे.
राष्ट्रवादीमधील तरुण आणि आक्रमक नेता म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते. त्यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने विविध आरोप केल्यामुळे मध्यंतरी त्यांची प्रतिमा डागाळली होती. त्यांचे चुलते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून तर केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी कृषीमंत्री पदाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना चालून आली आहे.
सध्या राज्यात पेरणी योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक भागात अद्याप पेरण्या झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तिथे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. राज्यभरात बोगस बियाणे, खतांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच १ रुपयात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचे आव्हान आहे. कृषी खात्याचे कामकाज सध्या पुरते ढेपाळले आहे.
धनंजय मुंडे यांना अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांतून मार्ग काढत कृषी खात्याचा कारभार रूळावर आणण्याच्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.