Animal Care : लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गाने होतो. लाळ्या खुरकूत आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी या आजारामुळे जनावराची कार्यक्षमता खूप कमी होते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लसीकरण हाच एक महत्त्वाचा उपाय आहे.
लाळ्या खुरकूत रोगाच्या साथी वारंवार येतात. त्यामुळे या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी नियमित लसीकरण करणे गरजेचं ठरतं. शासनाकडून वर्षातून दोन वेळा ही लसीकरण मोहीम राबविली जाते.
लाळ्या खुरकूत आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी जनावराची कार्यक्षमता खूप कमी होते, आर्थिक नुकसान होते. देशी जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असून संकरित दुभत्या जनावरांत दुग्धोत्पादन घटणे, प्रजोत्पादन क्षमता कमी होणे, वांझपणा येणे इत्यादी नुकसान होऊ शकतात. बैलांची शेतीकामाची क्षमता घटणे किंवा नष्ट होणे, जनावरांच्या विक्रीत, मांसाच्या निर्यातीत, चामड्याच्या उद्योगात घट होऊन पशुपालकांना व देशाला खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
आजारातून जनावर बरे होण्याचा कालावधी अधिक असून, कालावधीनुसार उपचाराचा खर्च वाढत जातो. दुधाळ जनावरास कासेवर पुरळ येऊन कासदाह झाल्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट होते. गाभण जनावरांत गर्भपात होऊ शकतो. काही जनावरांत तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वांझपणा येऊ शकतो. खुरांची जखम वाढून त्यात अळ्या होतात.
पूर्ण खूर गळून पडू शकते. जनावरात कायमस्वरूपी लंगडेपणा येऊ शकतो.जनावरांच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन अशी जनावरे उष्णता सहन न झाल्याने कायम धापा देत असतात. त्वचेवर केसांची वाढ व्हायला लागते व लहान जनावरांची वाढ खुंटते. हृदयात कमकुवतपणा येऊन लहान वासरांचा जागीच मृत्यू होऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय
आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर ठोस कोणताही उपचार नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. निरोगी जनावरांना वर्षातून दोन वेळा मार्च-एप्रिल व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण करून घ्यावे. गाय, म्हैस, शेळी व मेंढीवर्गीय जनावरात वासरू/ पिलू ४ महिन्याचे झाल्यावर प्रथम मात्रा द्यावी.
लसीकरणाबाबतचे गैरसमज आणि त्यामुळे होणारे नुकसान
लसीकरणामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात हे खरे आहे परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळू नये. लसीकरणामुळे गर्भपात होतो असा समज असून हा प्रकार क्वचित एखाद्या अशक्त जनावरांमध्ये घडू शकतो. लसीकरणामुळे जनावरावर ताण येऊन दूध उत्पादनात घट होऊ शकते परंतु ही घट तात्पुरतीच असते. काही दिवसातच जनावर पूर्ववत दुधावर येते.
गावातील एखाद्या पशुपालकाने लसीकरण केले नाही तर आपले काही नुकसान होत नाही हा पण एक गैरसमजच आहे. या लसीकरण मोहिमेत १०० टक्के जनावरांना लसीकरण होणे अपेक्षित आहे. एखाद्या पशुपालकाने लसीकरण करून घेतले नाही तर त्यांच्या जनावरात विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्याचा गावातील जनावरांना धोका आहे. म्हणूनच पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून जनावरांना लसीकरण करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.