Chana Seed Production Agrowon
यशोगाथा

Chana Farming : नेमाने झाले हरभरा बीजोत्पादनात ‘मास्टर’

माणिक रासवे

परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटरवरील दैठणा येथून गोदावरी नदीकाठी वसलेले साळापुरी गाव (ता. जि. परभणी) आहे. गावशिवारात खोल, काळी सुपीक (Fertile Soil) माती आहे. मुबलक पाणी आहे.

काही वर्षांपूर्वी येथील शेतकरी ऊस (Sugarcane) घेत. परंतु उत्पादकता कमी झाल्याने परवडत नसल्याने त्यांनी पीक पद्धतीत (Crop Pattern) बदल केला. खरिपात सोयाबीन (Kharif Soybean) आणि रब्बीत हरभरा (Chana) ही आजची मुख्य पद्धती आहे. अनेक शेतकरी या पिकांचा बीजोत्पादन (Seed Production) कार्यक्रमही घेतात.

सुपीक जमीन आणि काटेकोर पीक व्यवस्थापनातून अन्य गावांच्या तुलनेत साळापुरी येथील पीक उत्पादकता अधिक आहे. गावातील हरिभाऊ आनंदराव नेमाने यांचे शिक्षण बारावी (कॉमर्स) पर्यंत झाले आहे. त्यांच्या वाट्याला वडिलोपार्जित आठ एकर जमीन आली आहे.

वडिलांच्या काळात क्षेत्र जिरायती होते. गेल्या २० -२५ वर्षांपासून हरिभाऊ पूर्णवेळ शेती करतात. शेजाऱ्यांची २० एकर शेती ते करार पद्धतीने कसतात. घरच्या शेतीपैकी दोन एकरांत ऊस, उर्वरित क्षेत्रात सोयाबीन व हरभरा बीजोत्पादन तर करार शेतीतही हीच पद्धती असते.

हरिभाऊंचा हातखंडा

सोयाबीन व हरभरा बीजोत्पादनात हरिभाऊंचा हातखंडा तयार झाला आहे. त्यांना या विषयातील मास्टर म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण २० वर्षांहून अधिक काळापासून त्यात सातत्य आहे.

हरभऱ्याचे दरवर्षी १० ते १५ एकर बीजोत्पादन असते. काटेकोर व्यवस्थापनातून हरभऱ्याचे एकरी १० ते १२ क्विंटल, काहीवेळा १४ क्विंटल तर सोयाबीनचे १२ ते १४ क्विंटल बीजोत्पादन ते साध्य करतात.

पाणी व्यवस्थापन

पेरणी पूर्ण झाल्यानंतर तुषार संचाद्वारे पाणी. त्यामुळे ८ ते १० दिवसांनी संपूर्ण व व्यवस्थित उगवण होते. खतांची मात्रा लागू होते.

दुसरे पाणी फुले लागायच्या थोडे आधी. (एकावेळी चार तास.)

तिसरे पाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत. (एकावेळी सहा तास.)

स्वच्छता, प्रतवारी, साठवणूक

वाणनिहाय पीक पक्व कालावधी १०० ते ११५ दिवसांचा.

घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना अन्य वाणांची झाडे उपटून काढली जातात. त्यामुळे त्या त्या वाणांचे शुद्ध बियाणे मिळते.

काढणी ‘हार्वेस्टर’ तसेच मजुरांकरवी. ‘स्पायरल सेपरेटर’द्वारे प्रतवारी व स्वच्छता.

तागाच्या पिशव्यांमध्ये ५० किलो वजनी बियाणे पॅकिंग. सरकारी प्रयोगशाळेत बियाणे उगवणशक्ती तपासणी.

बियाणे साठवणुकीसाठी शेतात माफक खर्चात निवारा. लोखंडी खांबावर लाकडी पाट्या ठेवून बियाण्याची पोती विशिष्ट पद्धतीने रचल्या जातात. त्यामुळे बियाणे सुरक्षित राहते. पोत्यांची हाताळणी सुलभ होते.

अर्थकारण

दरवर्षी एकूण १०० ते १२५, १५० क्विंटलपर्यंत बियाणे उत्पादन मिळते. कंपनीतर्फे खुल्या बाजारातील दरापेक्षा २० टक्के अधिक दर मिळतो. शिवाय बोनस दिला जातो. त्यामुळे अधिक फायदा होतो. एकरी खर्च दहा हजार रुपयांपर्यंत येतो.

सोयाबीन बीजोत्पादन

कृषी विद्यापीठांकडून विकसित सोयाबीन वाणांच्या पायाभूत, प्रमाणित बियाण्याचे उत्पादन हरिभाऊ घेतात. दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे बियाण्याच्या दर्जावर परिणाम झाला. त्यामुळे उन्हाळी हंगामात बीजोत्पादन घेत आहेत.

मागील वर्षी डिसेंबर अखेरीस पेरणी केली. परंतु हिरव्या दाण्याचे प्रमाण असल्याने नुकसान होत असल्याचे आढळले. त्यामुळे यंदा १७ नोव्हेंबर रोजी १५ ते १६ एकरांवर टोकण राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या फुले दूर्वा वाणाचा प्रयोग केला आहे.

कुटुंबाची प्रगती

काही वर्षांपूर्वी नेमाने कुटुंब गावातील घरात राहायचे. अलीकडे शेतात बांधलेल्या घरामध्ये वास्तव्य आहे. मध्यंतरी मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्य परभणी येथे होते. हरिभाऊंचा मोठा मुलगा रमेश शेती करतो.

मधला उमेश नागपूर येथे फिजिओथेरपी विषयाचे तर धाकटा श्रीनिवास बी.फार्मसी अभ्यासक्रम शिकत आहे. पत्नी अंजना यांचीही शेतीत मोठी मदत होते. एक बैलजोडी व सालगडी आहे. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून बीज प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा मानस आहे.

हरभरा व्यवस्थापनातील ठळक बाबी

सरकारी बियाणे कंपनीसाठी बीजोत्पादन.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित फुले विक्रम, फुले विक्रांत, जॉकी ९२१८ आदी वाणांची निवड. सुधारित विविध वाणांचे प्रयोगही सुरू.

दरवर्षी ऑक्टोबरमध्ये २० तारखेनंतर पेरणी. गेल्या दोन- तीन वर्षांत पाऊस उशिरापर्यंत पडत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी लागते.

पेरणीपूर्वी एकरी ५० किलो डीएपी, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, १३ किलो पोटॅश मात्रा.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया. पेरणीपूर्वी एक तास आधी जैविक संवर्धक व बुरशीनाशकाची (रायझोबियम व ट्रायकोडर्मा) प्रक्रिया.

ट्रॅक्टरचलित पेरणी आणि रासणी यंत्राचा वापर. दोन ओळींत अंतर १८ इंच.

टोकण करण्यासाठी एकरी २० किलो तर पेरणीसाठी एकरी २८ ते ३० किलो बियाणे वापर.

किडींची आर्थिक नुकसान पातळी ओळखून फवारणीचा निर्णय. मर, मूळकूज, घाटे अळी या महत्त्वाच्या किडी. गरजेनुसार कीडनाशकांचा वापर.

ह्युमिक ॲसिडचा वापर. त्यामुळे पांढऱ्या मुळींची संख्या वाढते.

बैलचलित कोळप्याद्वारे पेरणीपासून १५ दिवसांनी पहिली तर पुढील सात ते आठ दिवसांत दुसरी कोळपणी. पहिल्या कोळपणीमुळे तण नियंत्रण होते. दुसऱ्या कोळपणीमुळे पिकाला माती लागते. त्यामुळे वाढ जोमाने होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT