Agriculture Padm Award : धुळे जिल्ह्यातील बारीपाडा (ता.साक्री, जि. धुळे) या वनवासी, आदिवासीबहुल क्षेत्रात अनेक संकटे, अडचणींचा डोंगर पार करून चैत्राम पवार यांनी जिद्द, कष्टी वृत्तीतून उजाड शिवार हिरवेगार केले.
जलस्रोत जिवंत केले. एकेकाळी ओसाड अशा या बारीपाड्यात जल, जमीन, जंगल यांच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक शेतीचे मॉडेल उभे करणाऱ्या चैत्राम पवार यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने धुळे (खानदेश) जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रतिकूलतेतून विकासाचा मार्ग
बारीपाड्याची १९९१-९२ पूर्वीची स्थिती बिकट होती. पांझरा नदीचा उगम या गावात आहे. मात्र डोंगराळ क्षेत्र असल्याने नदीचे पाणी वाहून जायचे. गावाच्या पलीकडे गुजरात राज्याचे क्षेत्र आहे. या काळात चैत्राम यांचा वनवासी कल्याण आश्रम संस्थेशी संपर्क आला. पुढे यातून विविध संस्था, व्यक्ती यांच्याशी ते जुळत गेले. शासकीय अधिकारी, वन विभाग, कृषी, महसुली विभाग यांचे सहकार्य मिळत गेले.
उजाड, ओसाड माळरान, पाणीटंचाई अशी संकटे, वृक्षतोड व अन्य समस्याही होत्या. जैवविविधता नष्ट होत होती. यातून शेतीसंस्कृतीच धोक्यात आली होती. परिसरातील ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले होते. शेती पाऊसपाण्यावर अवलंबून होती. पाऊस कमी झाल्यास किंवा दुष्काळी स्थिती राहिल्यास जेमतेम एखादा हंगाम हाती यायचा. त्यातून तयार झालेली आर्थिक व अन्य संकटे शेतकऱ्यांना आणि पर्यायाने गावाला सहन करावी लागत होती. पशुपालन, शेळीपालन याबाबतही संकटे होती.
बारीपाडा मॉडेल तयार झाले
सर्व प्रतिकूल परिस्थितीतून ध्येयवेड्या चैत्राम यांनी बँक व भारतीय वायूसेनेकडून नोकरीची आलेली संधी नाकारत गावासाठी विकासकार्य सुरू केले. वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या चैत्राम यांनी ग्रामस्थांना संघटित करण्यास सुरवात केले. चैत्राम यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली विकास, सुबत्ता हे तत्त्व घेऊन सर्वजण झटू लागले. गावात माती, पाण्याचे संवर्धन होऊ केले. वृक्षलागवड झाली.
पारंपरिक वाणांच्या संवर्धनावर भर दिला. ओसाड, उजाड माळरान, शिवार हिरवेगार होऊ लागले. गावातील सुमारे ४४५ हेक्टर क्षेत्राला नवसंजीवनी त्यातून मिळत गेली. गावातील जैवविविधता वाढीस लागली. चैत्राम यांच्या प्रयत्नांतून परिसरातील प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. जलसंधारण, जैव विविधता संवर्धन, महिला सक्षमीकरण व लोकसहभाग यातून शाश्वत विकासाचे मॉडेल बारीपाड्यात उभे झाले.
बारीपाड्यासह साक्री तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्रेरणा व गती देण्याचे काम चैत्राम यांनी केले. शैलेश शुक्ला (कॅनडा), सई हलदुले (जर्मनी) या अभ्यासकांनी बारीपाडा मॉडेलविषयी प्रेरित होऊन त्या विषयावर ‘पीएचडी’ पूर्ण केली. याशिवाय आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट अशा मान्यवर संस्थांमधील विद्यार्थी देखिल बारीपाड्यात येऊन अभ्यास करतात.
वनवासी कल्याण आश्रमाच्या ग्रामविकास समितीतर्फे चैत्राम देशभर कार्यरत आहेत. सुमारे ३२ वर्षांची त्यांची ही तपश्चर्या आहे. शुक्ला ‘पीएचडी’ च्या कारणांसाठी बारीपाड्यात असताना रानभाजी महोत्सव सुरू केला. असे महोत्सव राज्याचा कृषी विभागही सर्वत्र घेत आहे.
कार्याचा सन्मान
चांगले गाव कसे असावे याविषयी ७८ देशांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात बारीपाडा गावाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बारीपाडा प्रकल्पास मानाचा आयएफएडी (IFAD) या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. ॲग्रोवनमधूनही त्यांची यशकथा तसेच प्रयोगांची वेळोवेळी दखल घेण्यात आली असून उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
चैत्राम पवार ९८२३६४२७१३
वनवासी कल्याण आश्रम आणि विविध संस्था, तज्ज्ञ, अभ्यासक आदींचे मार्गदर्शन व त्यांच्यासोबत सुरू झालेला माझा प्रवास जल, जंगल, जमीन यासंबंधीच्या कार्यासाठी सुरूच आहे. पद्मश्री पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान माझ्या संपर्कातील सर्व संस्था, शासकीय विभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारीपाडा, धुळे आणि खानदेशचे ग्रामस्थ आदी सर्वांचा सन्मान आहे.चैत्राम पवार, सामाजिक कार्यकर्ते, बारीपाडा (ता.साक्री, जि.धुळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.