Ahilyanagar News : भारतात पस्तीस ते पंचेचाळीस टक्के, जपानमध्ये ९५ टक्के, चीनमध्ये ७५ टक्के यांत्रिकीकरण आहे. इतर देशांशी तुलना केल्यास आपल्या देशात यांत्रिकीकरणाला मोठा वाव आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये शेतकरी कमी आणि जमीन धारणा जास्त असल्याने तेथे शेतीसाठी मोठे यंत्रे विकसित झाले आहे.
आपल्याकडे छोट्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने छोटे यंत्र व अवजारे विकसित करणे आवश्यक असून तिफन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषीयंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन-२०२५ स्पर्धा होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या ट्रॅक्टरचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्रे या विषयावरील या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. गडाख यांच्या हस्ते झाले. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स, इंडियाचे अध्यक्ष डॉ. नागराजन गोविंदन, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, विवेक जोशी, राजेश लिंगमपल्ली, डॉ. अमोल रेलकर, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, राखी चांडक, संदीप अवसारे, संदीप राजपूत, बी. एस. रमेशा उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले, की आपल्या देशात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला वीस वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आता यात प्रचंड बदल झाले असून यांत्रिकीकरणाला कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्सची साथ मिळाली आहे. भविष्यातील शेती ही एआय आणि आधुनिक यंत्रावर आधारित असणार आहे. आपल्या देशात छोटे व अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या गरजेनुसार छोटे यंत्र व अवजारे विकसित करणे आवश्यक आहे. याचबरोबर बहुउद्देशीय यंत्रे, बॅटरीवर व सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रे विकसित करणे आवश्यक आहे.
तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषी यंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी ठरेल. डॉ. बनसोड, विवेक जोशी, राजेश लिंगमपल्ली, डॉ. अमोल रेलकर, राखी चांडक यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६६ संघ सहभागी झाले होते. त्यातील अंतिम फेरीसाठी नऊ राज्यातून ३६ संघाची अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे.
यामध्ये पंजाब राज्यातील चार संघ, तमिळनाडू राज्यातील पाच संघ, मध्य प्रदेश तीन संघ, केरळ, तेलंगण व दिल्ली प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून २१ संघ असे एकूण ३६ संघ सहभागी झालेले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अंतिम ३६ संघांनी बनविलेल्या ट्रॅक्टरचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्रांच्या पाच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चाचण्या होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष शेतावरती देखील या यंत्रांची परिक्षा घेतली जाणार आहे.
अंतिम फेरीत ३६ संघांतील स्पर्धेसाठी एकूण ७५० विद्यार्थी व विद्यार्थिंनी आणि ५० पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत. सूत्रसंचालन कृपाली पूर्वीया व गायत्री पाटील यांनी केले तर आभार रोहन जगदाळे यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.