Soybean Agrowon
संपादकीय

Soybean Research Center : संशोधन केंद्राबाबत राजकारण नको

विजय सुकळकर

Soybean Research Center Beed : राज्यातील कोणतेही संशोधन केंद्र ही त्या राज्याची संपत्ती असते. संशोधन केंद्रात होणारे संशोधन हे त्या राज्यातील एकूण अर्थकारणाला दिशा देणारे असते. मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी पायाभूत सुविधा, स्थानिक उत्पादनांच्या वाढीसाठी निरनिराळे संशोधन हे अत्यावश्यक आहेत.

अशावेळी छत्रपती संभाजीनगर येथे मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूरला होणारी तीन संशोधन केंद्रे बीड जिल्ह्यात पळविण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामागचे राजकारण आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम याचा विचार झालाच पाहिजे.

सन २०२१ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांनी लातूर जिल्ह्यासाठी देवणी गोवंश संशोधन केंद्र, पश्मी श्‍वान संशोधन केंद्र आणि सोयाबीन संशोधन केंद्राच्या घोषणा केल्या होत्या. या घोषणा यापूर्वी देखील या भागातील अनेक नेत्यांनी केल्या होत्या. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील संबंधित मंडळींनी याबाबत काही आराखडे तयार केले होते.

पण अचानक या तिन्ही संस्था सध्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या जिल्ह्यात परळीला पळविल्याचे जाहीर केल्याने लातूरमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कोणतेही संशोधन केंद्र उभे करताना त्यामागे खूप मोठा विचार झालेला असतो. त्यासाठी लागणारे वातावरण, पायाभूत सुविधा मुळातच ज्या गोष्टीवर संशोधन करायचे आहे त्याची उपलब्धता, त्याचा स्थानिक प्रसार आणि लोकसहभाग याचाही विचार केलेला असतो.

देवणी गोवंश हा लातूर जिल्ह्याची शान आहे. हरियाना कर्नाल येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन केंद्राने संशोधन करून लातूर जिल्ह्यातील देवणी गोवंशाच्या मूळ स्थानांवर शिक्कामोर्तब केला आहे. लातूरसह परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांचा पूर्व भाग, नांदेडच्या पश्‍चिम भागात देवणी गोवंशाचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते.

उदगीर आणि परभणी येथील अनुक्रमे पशुवैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयांमध्ये देवणी गोवंशासाठी स्वतंत्र प्रक्षेत्रे यापूर्वीच विकसित केले आहेत. लातूर येथे स्थानिक सेवानिवृत्त पशुवैद्यकांनी एकत्र येऊन देवणी गोवंश पैदासकार संस्था स्थापन करून त्याबाबत प्रयत्नही सुरू केले आहेत.

साधारण १९३० पासून स्थानिक देवणी गोवंशाबाबत कमी जास्त प्रमाणात लोकजागृती करून काही अवगुण कमी करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न सुरू आहेत. या सर्व गोष्टींना कुठेतरी मर्यादा येत होत्या. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून लातूर येथे संशोधन केंद्र मंजूर झाले होते. त्याचप्रमाणे सोयाबीनसाठी लातूर जिल्हा प्रसिद्ध आहे.

लातूरला सोयाबीन परिषद घेतली होती त्या वेळी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे हजर होते. त्या ठिकाणी त्यांनी या केंद्राबाबत घोषणाही केली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. तीच बाब पश्मि या श्वान प्रजातीबाबत आहे.

मुळातच लातूरच्या वडवळ आणि जानवळ या गावातील श्वानप्रेमी पशुपालकांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेले व निवड पद्धतीने वाढवलेली ही प्रजाती आहे. शिकारीसह शेती व पशुधनाच्या संरक्षणासाठी उपयुक्त अशा या प्रजातीची संशोधन केंद्र देखील वाढत चाललेल्या देशी श्वानाचे महत्त्व ओळखून लातूर ठिकाणी मंजूर केले होते. परंतु हे तीनही संशोधन केंद्र परळी येथे हालविण्याचा निर्णय कशासाठी घेतला? हा संशोधनाचा विषय आहे.

ज्या बाबतीत संशोधन करायचे आहे त्याची स्थानिक उपलब्धता, त्याबाबतची जाण, शैक्षणिक संस्थांची भागीदारी, संदर्भानुसार मापदंडांचा विचार केला तर निश्‍चितपणे या संस्था लातूर या ठिकाणी हव्यात. त्याचा लाभ हा स्थानिक पशुपालकांनी आतापर्यंत योगदान देऊन जपलेल्या प्रजातींना शासकीय पाठबळ मिळून आणखी विकसित होतील. त्याचा प्रचार आणि प्रसार करता येईल. हा विचार जर संबंधितांनी केला नाही, तर होणारे नुकसान हे फार मोठे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT