Sangli News: सततच्या वाढत्या उष्णतेचे ग्रहण राज्यातील अंबिया बहरातील डाळिंबाला लागले आहे. यंदाच्या या हंगामातील ५० टक्के फूलगळ झाली असल्याचा प्राथमिक अंदाज अखिल भारतीय डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. त्यातच सेटिंगलाही अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी डाळिंब उत्पादक शेकऱ्यांची बुडत्याचा पाय, आणखी खोलात, अशी अवस्था झाली आहे.
महाराष्ट्र डाळिंब उत्पादन घेण्यास अग्रेसर असून निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. राज्यात सर्वसाधारण पणे ३० ते ३५ हजार हेक्टरवर अंबिया बहर धरला जातो. जानेवारीमध्ये हा बहर धरला जातो. या हंगामातील डाळिंबाची विक्री जुलैपासून सुरू होते. गणपतीच्या दरम्यान, डाळिंबाला चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकरी त्यादृष्टीने बहराचे नियोजन करतो. गतवर्षी ३० हजार हेक्टरवर बहर धरला होता. मात्र, पावसामुळे तेलगट रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. अशा परिस्थितीतही या बहरातील डाळिंबाला चांगले दर मिळाले होते.
यंदाच्या हंगामात जानेवारीपासून बहर शेतकऱ्यांनी धरला आहे. बहर धरतेवेळी पोषक वातावरण होते. बहर धरून चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, गेल्या महिना ते दीड महिन्यापासून उष्णता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबाचे नियोजन करणे मुश्कील बनले आहे. सतत वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंब पिकाला बसला आहे. परिणामी फुरोलावस्थेत उष्णेमुळे फूलकळी निघण्यास आणि सेटिंग होण्यास अडथळे निर्माण झाले. या साऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात फूलगळ झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब बागा साधल्या आहेत. सध्या डाळिंब अंदाजे ७० ते १०० ग्रॅम इतक्या वजनाचे आहे. मात्र, उष्णतेमुळे फूलगळ झाली असल्याने फळांची संख्याही कमी आहे. अर्थात डाळिंबाचे उत्पादनही कमी होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. वातावरण असेच राहिले तर, डाळिंबाच्या वाढीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
हस्तातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात
हस्त बहरातील डाळिंबाला नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी डाळिंबाचे उत्पादनही घटले. मात्र, हंगामाच्या प्रारंभापासून डाळिंबाला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या बहरातील डाळिंबाला दर्जानुसार १०० ते १७० रुपये असा दर होता. गेली दोन महिने दर टिकून होते. मात्र, हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असताना वाढत्या तापमानाचा फटका डाळिंबाला बसला. त्यामुळे डाळिंबाचे दर कमी झाले. सध्या डाळिंबाला १०० ते १५० रुपये असा दर मिळत आहे. डाळिंबाचे दर टिकून राहतील, असा अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
डाळिंबावरील संकट कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडथळे तसेच आहेत. वाढत्या उष्णतेमुळे फूलगळ झाली असल्याने फळांची संख्याकमी कमीच आहे. त्यामुळे पीक धोक्यात आहे.प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.