Kolhapur News : केंद्राने साखर निर्यातीस परवानगी दिल्यानंतर देशातील साखर कारखान्यांनी सहा लाख टन साखरेचे निर्यात करार केले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात गतीने करार झाले पण गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारातही साखरेचा दर निर्यात केल्यानंतर मिळणाऱ्या दराच्या जवळपास आल्याने कराराची गती काहीशी मंदावली आहे.
सध्या निर्यात करार थोडेसे हळूवार पणे होत असले तरी केंद्राने दिलेला दहा लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट कारखाने निश्चितपणे गाठतील, असा विश्वास साखर उद्योगाने व्यक्त केला आहे. करार केलेल्या साखरेपैकी सुमारे अडीच लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती आदी देशांना ही निर्यात झाली आहे.
स्थानिक किमती स्थिर ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात थांबवल्यानंतर, केंद्राने जानेवारीत १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. या निर्णयाचा उद्देश कारखान्यांना अतिरिक्त साठा विकण्यास मदत करणे हा होता. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखरेचे दर ३६०० ते ३७०० रुपयांच्या आसपास होते. याच वेळी निर्यातीचे दर ४००० रुपयांपर्यंत होते. यामुळे या कालावधीत अनेक कारखान्यांनी निर्यातीला पसंती दिली.
गेल्या पंधरा दिवसांपासून देशांतर्गत बाजारात साखरेचे दर ३९०० रुपयांपर्यंत पोहोचले. यामुळे ज्या प्रमाणात साखरेच्या निर्यात करारची गती होती ती मंदावली. निर्यातीच्या सोपस्कारापेक्षा स्थानिक बाजारात साखरेच्या विक्रीला कारखाने प्राधान्य देत आहेत. कमी उत्पादन आणि उन्हाळ्यातील मागणीमुळे दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा असल्याने अनेक कारखाने निर्यातीचे करार थोड्या थोड्या प्रमाणात करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात सर्वच राज्ये पिछाडली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० लाख टनांपर्यंत साखर घटीचा अंदाज आहे. जसा हंगाम पुढे जाईल तशी साखर उत्पादनातील तूट प्रत्यक्षात दिसून येत आहे. यामुळे हंगामाच्या समाप्तीनंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन घटणार असल्याने स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस तरी साखरेचे दर चांगले रहातील, अशी शक्यता आहे.
थंडी कमी झाल्यानंतर मार्चच्या मध्यापासून ते जूनपर्यंत साखरेला शीतपेय व आइस्क्रीम उद्योगातून सातत्याने मागणी असते. पुढे दर वाढतील या अपेक्षेने शीतपेय व व्यावसायिक हंगाम सुरू असेपर्यंत तरी साखरेच्या खरेदीला प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे. यामुळे साखरेचे दर सध्या तरी टिकून आहेत.
निर्यातीचा निर्णय झाला त्या वेळी साखरेचे दर कमी होते. उठावही फारसा नव्हता. यामुळे साखरेची विक्री तत्काळ व्हावी यासाठी अनेक कारखान्यांनी आपल्या कोट्यानुसार करार केले. सध्या करार तेवढे गतीने होत नसले तरी अजूननी निर्यातीचा अवधी सप्टेंबरपर्यंत आहे, यामुळे केंद्राने दिलेल्या कोट्याइतकी साखर निर्यात होण्यास अडचण नाही.- पी. आर. पाटील, अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.