
Kolhapur News : केंद्राने यंदाच्या हंगामासाठी (२०२४-२५) दहा लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी (ता.२०) ‘एक्स’ अकाऊंटवरून ही माहिती दिली. देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांना ऊस बिले वेळेत कारखान्यांना देता यावीत, कारखान्यातील पाच लाख कामगारांना वेळेत वेतन मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साखरेच्या किमतीत स्थिरता यावी या उद्देशाने या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. २१-२२ मध्ये सुमारे ११० लाख टन, २२-२३ मध्ये सुमारे ६० लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या हंगामात साखर निर्यातीला परवानगी केंद्राने दिली नव्हती.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे उपसचिव सुरेशकुमार नायक यांनी कारखान्यांना काढलेल्या आदेशात निर्यातीबाबतची सविस्तर माहिती दिली. १० लाखांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक पावणे चार लाख टन (३ लाख ७४ हजार ९९६) कोटा मिळाला आहे. या खालोखाल उत्तर प्रदेशला २ लाख ७४ हजार १८६ टन कोटा मिळाला आहे. कर्नाटकला पावणे दोन लाख टनांचा (१ ला ७४ हजार ९८० टन) कोटा देण्यात आला आहे. एकूण कोट्याचा ७५ टक्के कोटा या तिन्ही राज्यांना मिळाला आहे. साखर उत्पादनात ही तिन्ही राज्ये आघाडीवर मानली जातात.
या आदेशानुसार कारखान्यांनी गेल्या तीन हंगामाच्या सरासरी ३.१७ टक्के साखर निर्यात करायची आहे. प्रत्येक कारखान्याच्या साखर उत्पादनांची माहिती घेऊन देशातील कारखान्यांना स्वतंत्र कोटा दिला आहे. कोणत्याही प्रकारची साखर ते निर्यात करू शकतात. पूर्वीच्या नियमाप्रमाणे कोटा आदान-प्रदान योजना या निर्णयासाठीही लागू करण्यात आली आहे.
ज्यांना साखर निर्यात करायची नाही ते कारखाने निर्यात करणाऱ्या कारखान्यांना कोटा देऊ शकतात, त्यांचा स्थानिकचा कोटा आपण घेऊ शकतात. ३१ मार्चपूर्वी हे कोटे अदलाबदल करता येऊ शकतात. ३० नोव्हेंबरपर्यंत कारखाने दिलेली साखर निर्यात करू शकतात. कारखान्यांनी साखर निर्यातीबाबत काय निर्णय घेतले याची माहिती कारखान्यांनी सरकारला ‘एनएसडबलूएस’ या पोर्टलवर देणे गरजेचे आहे.
साखर उद्योगातून स्वागत
गेल्या अनेक महिन्यांपासून साखर निर्यातीला परवानगी, साखरेच्या किमान विक्री मूल्यात वाढ, इथेनॉलच्या विक्री किमतीत वाढ या प्रमुख मागण्या होत्या. निर्यातीच्या मागणीपेक्षा एमएसपी वाढीवर जोर होता. केंद्राने एमएसपी वाढीचा निर्णय मागे ठेवत निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. जे कारखाने साखर कारखाने निर्यात करणार नाही त्यांना याचा फायदा होणार नाही. सर्वाधिक निर्यात करणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखान्यांना याचा फायदा होऊ शकतो. केंद्राने किमान निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने साखर उद्योगाकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
साखर बाजारात काहीशी तेजी
केंद्राच्या निर्णयानंतर साखर बाजारात काहीशी तेजी पाहावयास मिळाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत साखरेचे दर क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढल्याचे चित्र होते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास निर्यात होणाऱ्या साखरेला ३८०० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल मिळू शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.