Jalgaon News: खानदेशात रब्बी हंगामात खपली गहू पेरणी कमी झाली. सध्या पीक मळणीवर येत आहे. लवकरच मळणी सुरू होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.खपली गहू पेरणी मध्यंतरी वाढत होती. परंतु या गव्हाच्या मळणीसंबंधीची किचकट व खर्चिक पद्धत आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे खपलीची पेरणी कमी किंवा हवी तशी नसल्याची स्थिती आहे. त्यात पीक सध्या पक्व होत आहे.
पुढील पंधरवड्यात मळणी होईल. त्यात एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन येऊ शकते, असा अंदाज आहे. यंदा सुमारे ५० एकरांत जळगाव जिल्ह्यात खपली गहू पेरणी झाल्याचा अंदाज आहे. खपली गव्हासंबंधी रावेरातील दसनूर, मस्कावद, पाल, रोझोदा, खिरोदा, यावल व जळगाव, चाळीसगाव भागातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले.
काही शेतकऱ्यांनी या गव्हाच्या मळणीसाठी यंत्रणा आणली. परंतु अन्य शेतकरी मात्र मळणीची खर्चिक व वेळखाऊ पद्धत यामुळे त्रस्त झाले. तसेच त्यास बाजारपेठेही हवी तशी मिळाली नाही. यामुळे त्याची लागवड फारशी वाढली नाही. रावेर, यावल व जळगावात काही शेतकरी त्याची पेरणी किंवा लागवड करीत आहेत.
खपली गहू मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणेचा अभाव खानदेशात आहे. मळणीअभावी गव्हाचा उपयोगच सध्या होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणा, आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत.
खपली गहू पेरणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५ एकरांत बीजोत्पादन कार्यक्रम मध्यंतरी घेतला होता. पुढील टप्प्यात जिल्ह्यात खपली गव्हाखालील क्षेत्र आणखी वाढावे, असा उद्देश यामागे होता. तसेच अनेक शेतकऱ्यांनी खपली गहू बियाणे खरेदी करून त्याची एक ते दोन एकरांत पेरणी केली. धुळ्यातही पेरणी झाली होती.
पण मळणीसाठी जळगाव, धुळ्यात यंत्रणा नाही. घरी खाण्यासंबंधी किंवा वापरासाठी गहू तयार करण्याच्या प्रयत्न शेतकरी करीत होते. पण कृषी यंत्रणांकडून मदत, मार्गदर्शन मिळाले नाही. त्यासाठी प्रचलित गहू मळणीची यंत्रणा कुचकामी ठरते. शेतकऱ्यांनी प्रचलित किंवा ट्रॅक्टर, लहान इंजिनचलित यंत्रांद्वारे मळणी केली. पण त्यात गहू तयार झाला नाही. मळणीवरील खर्च वाया गेल्याच्या तक्रारी आहेत. मळणीसाठी राइस मिलच्या धर्तीवरची यंत्रणा विविध गावांमध्ये स्थापन करण्याची गरज आहे.
मळणी व स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने या गव्हीची विक्री शेतकरी करू शकत नाहीत. कारण खरेदीदारांना व्यवस्थित स्वच्छ केलेला गहू हवा असतो. या गव्हाचे दर टिकून असतात. त्याला आयुर्वेदीय मान्यता आहे. आरोग्यविषय जागरूक मंडळी त्याची मागणी नोंदवितात. पण बाजार समित्या किंवा अन्य बाजारांत त्यास उठाव नाही. यामुळे व्यावसायिकदृष्ट्या त्याची पेरणी वाढलेली नसल्याची स्थिती आहे.
बाजारपेठेचा अभाव
खपली गव्हाचे क्षेत्र पुढे वाढवून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा असेल तर शहरे, मोठी गावे किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रानजीक मळणीसाठी राइस मिलच्या धर्तीवर यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. शिवाय चांगली बाजारपेठही उपलब्ध करण्याची गरज आहे. कारण बाजार समितीत या गव्हास उठाव नसतो. तसेच स्थानिक धान्य विक्रेत्यांमध्येही त्याबाबत फारशी जागरूकता, माहिती नाही. कृषी विभागाकडून यावर जनजागृती व बाजार व्यवस्था उभारली जावी, अशी मागणीही होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.