Kolhapur News : यंदा अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यातील मिरचीचा हंगाम गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे पंधरा दिवस लवकर आटोपला आहे. पावसामुळे कोल्हापूरसह गडहिंग्लज बाजारपेठेतील मिरचीचा उठाव सध्या कमी प्रमाणात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे मळभ काहीसे दूर झाल्याने ऊन पडल्यास ग्राहक मिरची खरेदीला पसंती देतील अशी शक्यता आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरनंतर मिरचीचा हंगाम सुरू होतो. जिल्ह्यात कोल्हापूर बरोबरच गडहिंग्लज बाजारपेठांमध्ये मिरचीची मोठी उलाढाल होते. या भागातील अनेक व्यापारी कर्नाटकातून मिरचीची मागणी नोंदवतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटकासह महाराष्ट्रातील मिरची उत्पादक प्रदेशात चांगला पाऊस झाला यामुळे मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी मिरचीच्या दरात तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत घट झाली.
मिरची हंगाम प्रारंभ झाल्या झाल्याच दर कमी झाल्याने ग्राहकांचा ओढा मिरची खरेदीला होता. यंदा जानेवारीपासून मे च्या पूर्वार्धापर्यंत उन्हाचा तडाखा मोठा असल्याने बाजारपेठा ग्राहकांच्या खरेदीने फुलून गेल्या. ब्याडगीसह अन्य मिरच्यांनाही यंदा मागणी अधिक होती. संकेश्वरीसारख्या सर्वाधिक दर असणाऱ्या मिरचीलाही यंदा मध्यम दर मिळाला.
या कालावधीत मिरचीची खरेदी जादा झाली. अनेक ठिकाणी मोसमी पाऊस सुरू होईपर्यंत म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्याअखेर मिरचीची विक्री सुरू असते. यंदा मात्र मे च्या पहिल्या सप्ताहात अनेक ठिकाणी वळीव पाऊस झाला.
पंधरा तारखेनंतर मात्र संततधार पद्धतीने पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने मिरचीची खरेदीच थांबली. दहा ते बारा दिवस सूर्यदर्शन न झाल्याने खरेदी केलेल्या मिरचीची चटणी करणेही शक्य झाले नाही.
अनेक व्यापाऱ्यांनी मिरची खराब होऊ नये यासाठी शीतगृहात ठेवण्याला प्राधान्य दिले. यामुळे मिरची बाजार सध्या तरी थंडावला आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. काही ठिकाणी ऊन पडत असल्याने ऊन वाढल्यास काही प्रमाणात मिरची खरेदी विक्री वाढेल, असा अंदाज आहे.
मिरचीचे दर कमी झाल्याने यंदा मिरची खरेदी झाली. अंतिम टप्प्यातील खरेदी मात्र पूर्वमोसमी पावसामुळे थंडावली. पुढे ऊन पडल्यास मिरची खरेदी थोड्या प्रमाणात तरी होईल असे वाटते. दर मात्र कमी किंवा अधिक होतील, अशी शक्यता कमी आहे.- किरण तपकिरे, मिरची व्यापारी, कोल्हापूर
यंदा पावसामुळे मिरची बाजार मे मध्ये एकदम ठप्प झाला. शेतकऱ्यांकडून मिरची अगोदर आली असल्याने त्यांचे मात्र पावसामुळे फारसे नुकसान झाले नाही. मे च्या विक्रीसाठी आणलेली मिरची अनेक व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे.- राजू जाधव, मिरची व्यापारी, गडहिंग्लज बाजार समिती
सलग पाऊस सुरू झाल्याने मिरची कांडपाचे काम ऐन उन्हाळ्यातच थांबले. अनेकांनी मिरची घेऊन ठेवली होती. आता पाऊस थांबल्या थांबल्या पुन्हा चटणी करून घेण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू आहे.- अर्चना देसाई, चटणी व्यावसायिक, कळंबे तर्फे कळे, जि. कोल्हापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.