Edible Oil  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import Duty: खाद्यतेल आयात शुल्कात कपात

Soybean Farmers Impact: केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव वाढवला असतानाही खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कात १० टक्के कपात केली आहे. यामुळे तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे आणि सोयाबीनच्या भावावर दबाव वाढणार आहे.

Team Agrowon

Pune News: केंद्र सरकारने एकीकडे सोयाबीनचा हमीभाव वाढवला आणि दुसरीकडे खाद्यतेल आयात शुल्क कमी करून भाव पाडण्याचीही सोय केली आहे. खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केल्याने तेलाचे भाव कमी होणार आहेत. याचा थेट दबाव सोयाबीनच्या भावावर येणार आहे. यामुळे सोयाबीनला हमीभाव मिळण्याची शक्यताही धूसर आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने बुधवारी (ता. २८) मोठा गाजावाजा करत सोयाबीनच्या हमीभावात जवळपास ८ टक्क्यांची वाढ केली. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपयांवर पोचल्याने शेतकऱ्यांमध्येही काहीसे समाधान होते. पण सरकारने तिसऱ्याच दिवशी कच्च्या खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली आणि त्यावर पाणी फेरण्याचे काम केले.

कच्च्या खाद्यतेल आयातीवर मूळ आयात शुल्क २० टक्के होते. त्यावर कृषी पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण अधिभारासहीत २७.५ टक्के शुल्क लागू होते. पण केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.३०) खाद्यतेलावरील मूळ आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली. खाद्यतेल आयात शुल्क आता २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. कच्चे सोयाबीन तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पामतेल आयातीवरील शुल्कात कपात करण्यात आली आहे.

सरकारने कच्च्या खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात केली असली तरी रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे. रिफाइंड तेलावरील आयातशुल्क ३५.७५ टक्के आहे. आता कच्चे तेल आणि रिफाइंड तेल आयात शुल्कातील तफावत १९.२५ टक्के झाली आहे. आधी केवळ ८.२५ टक्के तफावत होती. त्यामुळे कच्च्या तेलाऐवजी रिफाइंड तेलाची आयात वाढली होती. इंडोनेशिया आणि मलेशियादेखील रिफाइंड तेल निर्यातीला अनुदान देत आहे. याचा देशातील रिफायनरींवर परिणाम होत होता. पण आता रिफायनरींना दिलासा मिळणार आहे.

आत्मनिर्भरतेची वल्गना

केंद्र सरकारने खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण सरकारने आयात शुल्क कमी करून आयातीला पायघड्या घातल्या आहेत. यामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने आयात शुल्कात वाढ करणे गरजेचे होते. पण सरकारने स्वतःच्या उद्दिष्टाला बगल देण्याचे काम केले आहे.

अडचणी वाढणार

आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा जास्त असल्याने आधीच सोयाबीनचे भाव दबावात आहेत. या परिस्थितीत खाद्यतेलाचा सोयाबीनला आधार आवश्यक होता. पण सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने तेलाचेही भाव कमी होणार आहे. त्यामुळे नव्या हंगामात सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव मिळण्याची शक्यताही धूसर होत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा असल्याने सोयापेंड आणि तेलाचे भाव कमी आहेत. त्यामुळे देशात आयात वाढेल. याचा दबाव सोयाबीनच्या दरावर येईल. शेतकरी अडचणीत येतीलच. पण सरकारचीही कोंडी होणार आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

केंद्र सराकरने रिफाइंड तेल आयात शुल्क कायम ठेवले. पण कच्च्या तेलावरील शुल्क कमी केले. यामुळे देशातील रिफायनरी आणि ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कच्च्या तेलाची आयात वाढून दरही कमी होण्यास मदत होईल.
बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक,‘एसईए’ (सोल्वेंट एक्सट्राक्शन असोसिएशन)
सरकारच्या या निर्णयाने तेलाचे भाव कमी होऊन सोयाबीनचेही भाव कमी होणार आहेत. एकीकडे हमीभाव वाढवायचा आणि दुसरीकडे तेल आयात स्वस्त करून भाव पाडायचे. यातून खाद्यतेल आत्मनिर्भरता येणार आहे का? सरकारच्या या निर्णयाने नव्या हंगामातही सोयाबीन उत्पादक अडचणीत येणार आहेत.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT