Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Alphonso Mango Season: वाशीत हापूसच्या ८० हजार पेट्यांची आवक; सर्वाधिक ४ हजार रुपये पेटीला दर

Vashi Mango Market Rate: नवी मुंबईतील वाशी बाजारात हापूस आंब्यांची विक्रमी ८० हजार पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे दरात घट झाली असून, दर्जेदार हापूस ३५०० ते ४००० रुपये दराने विकला जात आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News: नवी मुंबई येथील बाजार समितीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची बंपर आवक झाली आहे. सोमवारी (ता. ७) १ लाख हापूस आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या असून, त्यामध्ये ८० हजार पेट्या हापूस आंब्याच्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरित २० हजार पेट्या परराज्यातील आंब्यांच्या आहेत. पेट्यांच्या संख्या वाढल्यामुळे हापूसचे दर ३५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हापूसचे दर आवाक्यात आल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र दर कमी आल्यामुळे बागायतदार नाराज झाले आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अपेक्षित मोहर आला नाही. त्यामुळे यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यांत हापूसचे उत्पादन कमीच राहिले. परिणामी, बाजारातील हापूसच दर पाच डझनाच्या पेटीला ६ ते ८ हजार रुपये होता. गुढीपाडव्यालाही बाजारातील आवक कमीच होती. त्या वेळीही दर पेटीला ६ हजार रुपायंपर्यंतच राहिला.

दर चढे असल्याने सर्वसामान्यांना हापूसची चव चाखता येत नव्हती. मागील पंधरा दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर उष्माही अधिक वाढला. परिणामी हापूस वेगाने तयार होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारातील पेट्यांची संख्याही वाढलेली आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत प्रथमच ८० हजार पेटी हापूस कोकणातून वाशी बाजारात दाखल झाला आहे.

त्यामध्ये रायगडमधून अत्यल्प असून सर्वाधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधीलच आहेत. दर्जेदार फळाच्या पेटीला सर्वाधिक ४ हजार रुपये दर मिळत आहेत. तर डागी आंब्याला पेटीचा दर १ हजार रुपये आहे. एप्रिल महिन्यात हापूस अधिक चवदार होतो आणि गोडीही वाढत असल्याने ग्राहकांकडून मागणी सुरू होते.

दरम्यान, यंदा वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. या बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर होत आहे. या वर्षी राजापूर तालुक्यातून सर्वाधिक आंबा बाजारात दाखल होत असल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले.

यंदा हापूसचे उत्पादन कमी आहे. मात्र एप्रिल ते मेचा पहिला आठवडा या कालावधीत मुबलक पीक हाती येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कालपासून मोठ्या प्रमाणात पेट्या येण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढली की आपसूकच दर कमी होतात. ग्राहकांकडून खरेदी वाढणेही तेवढेच गरजेचे आहे.
संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी
रत्नागिरीतील किनारी भागातील बागांमधून मोठ्या प्रमाणात आंबा काढणी सुरू आहे. २० मेपर्यंत हा हंगाम सुरू राहील. आवक वाढल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार रुपयांनी हापूसचे दर कमी झाले आहेत. गेल्या वर्षी रामनवमीला ४५०० रुपये पाच डझनाच्या पेटीचा दर होता. यंदा तो ३५०० रुपयांपर्यंत आलेला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि नफा याचे गणित बिघडणार आहे. यामध्ये विक्रेत्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे.
उमेश रहाटे, आंबा बागायतदार

थेट विक्रीतून हापूसला चांगला दर : बिर्जे

उन्हामुळे आंबा भाजायला लागलेला आहे. त्यामध्ये पावसाचीही भीती बागायतदारांपुढे आहे. त्यामुळे आंब्याची तोड वेगाने केली जात आहे. त्यामुळे बाजारात हापूसची आवक वाढत आहे. परंतु नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आणि दर्जेदार हापूसला थेट ग्राहकांकडून डझनाला एक हजार रुपये आणि पाच डझनाच्या पेटीला ५ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. सध्या आम्ही बंगळूर, गोवा, हैदराबाद, नागपूर येथे हापूसच्या पेट्या पाठवीत आहोत. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आह, अशी प्रतिक्रिया आंबा बागायतदार जयवंत बिर्जे यांनी व्यक्त केली.

दररोज १२ हजार बॉक्स परदेशात

हापूसची आवक वाढत असली तरीही आखाती देश, युरोप, अमेरिका देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. दररोज १२ हजार हापूसचे बॉक्स पाठवले जातात. त्याला दरही चांगला मिळत आहे. निर्यात व्यवस्थित सुरू असल्यामुळे सध्याचे दर हा महिना स्थिर राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT