Nashik News: मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यासह आता सनबर्निंगमुळे नुकसान दिसून येत आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षमालाची उपलब्धता कमी असताना काही ठरावीक निर्यातदार दर पाडून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्यवहार करताना घाई नको, योग्य दरानेच व्यवहार करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी केले आहे.
पावसाच्या तडाख्यात द्राक्षबागांमध्ये द्राक्ष हंगाम प्रभावित झाला आहे. परिणामी सप्टेंबरमध्ये आगाप छाटणी झालेल्या द्राक्ष बागांसह काही ठिकाणी जवळपास ३५ ते ४० टक्के नुकसान आहे. परिणामी मालाची उपलब्धता कमी असल्याने, यंदा हंगामात चांगले दर मिळत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून निर्यातक्षम द्राक्षमाल कमी दराने काही ठरावीक निर्यातदार खरेदी करत आहे. त्यामुळे किलोमागे सरासरी २५ रुपयांचे नुकसान होत आहे.
यंदा उत्पादनात घट असल्याने एकाचवेळी आवक झालेली नाही. युरोपियन देशांमध्ये द्राक्षांची निर्यात सुरू झाल्यानंतर मालाची उपलब्धता तुलनेत कमी आहे. मात्र असे असताना काही निर्यातदार व निर्यात कंपन्यांनी दर नियंत्रणात ठेवल्याचे चर्चेत आले आहे.
काही निर्यातदारांनी दर कमी करण्याच्या अनुषंगाने बैठक घेतली असून ७० रुपयांच्या आतच खरेदी होईल, असे हालचाली होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध होऊन योग्य व्यवहार करावेत, असे संघाने कळवले आहे.
वास्तविक पाहता गत वर्षी १ नोव्हेंबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत युरोपीय देशासाठी २,४९६ कंटेनरद्वारे सुमारे ३२,३५५ टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला आहे. तर, युरोपीय देशांव्यतिरिक्त इतरत्र ९४१ कंटेनरमधून १५,००५ टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला, असा एकूण ३,४३७ कंटेनरमधून ४७,३६० टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला होता. त्यावेळी निर्यातक्षम द्राक्षमालाला ७० ते १२५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाले होते.
त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष निर्यातदार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत द्राक्ष मालाचा व्यवहार करण्यास घाई करू नये. प्रत्यक्ष निर्यातदार फर्मचे संचालक अथवा व्यापारी यांच्याशी संपर्क करून विश्वासार्हतेची पडताळणी करून व्यवहार करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख, मानद सचिव बबनराव भालेराव आदींसह विभागीय संचालक मंडळाने केले आहे.
२८,२९६ टन द्राक्षमाल निर्यात
चालू द्राक्ष हंगामाचा विचार करता १ ऑक्टोबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत युरोपीय देशासाठी १,२२७ कंटेनरद्वारे सुमारे १६,२६० टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला आहे. तर युरोपीय देशांव्यतिरिक्त इतरत्र ८१६ कंटेनरमधून १२,०८९ टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला, असा एकूण २,०४३ कंटेनरमधून २८,२९६ टन द्राक्षमाल निर्यात झाला आहे. त्यामुळे यंदा निर्यात कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे घाई नको, असे संघाचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.