
Sangli News: निसर्गाच्या अवकृपेवर शेतकऱ्यांनी मात करत यंदाच्या द्राक्ष हंगामाला गती आली आहे. राज्यात आत्तापर्यंत २५ टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री झाली आहे. द्राक्षाचे दर टिकून आहेत. हंगामाच्या प्रारंभीपासून यंदा द्राक्षाची गोडी वाढली आहे. येत्या काळात द्राक्षाचे दर वाढण्याचीही शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील द्राक्ष विक्री नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू झाली. हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. गेल्या आठवड्यापासून द्राक्ष हंगामास गती आली आहे. देशभरातील व्यापारी द्राक्षपट्ट्यात दाखल झाले आहेत. द्राक्ष खरेदीची लगबग सगळीकडे सुरू आहे. बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने द्राक्षाचे दर चांगले आहेत.
बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढली आहे. जानेवारी महिन्यात मध्यावर ६० रुपयांपासून ते ११० रुपये प्रति किलो असा दर होता. मधल्या काळात द्राक्षाच्या दरात प्रति किलोस १० रुपयांनी दर घटले होते. परंतु द्राक्षाच्या दरातील घट फार काळ राहिली नाही. त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली.
सध्या द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने पीक चांगले आहे. द्राक्षात गोडी उतरली आहे. रंग, आकार चांगला आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून हंगाम जोरदार सुरू होईल. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत द्राक्षाचा मोठा उठाव होणार आहे. द्राक्षाचे उत्पादन घटल्याने मागणी अधिक आहे, पण त्यादृष्टीने पुरवठा होत नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात द्राक्षाचे दर वाढण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उत्पादनात ५० टक्के घट
द्राक्षाचे सरासरी उत्पादन १० ते १४ टनापर्यंत शेतकरी घेतात. मात्र, यंदा द्राक्ष पिकाच्या फळ छाटणीपासून विविध वाढीच्या टप्प्यात निसर्गाची अवकृपा झाल्याने बागेचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीच्या काळात ४० टक्के उत्पादन घटणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, द्राक्ष काढणी सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ होऊन ती सध्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अर्थात सध्या एकरी चार टनांपासून ते १० टनांपर्यंत उत्पादन हाती येत आहे, असे द्राक्ष बागायतदार संघाने सांगितले आहे.
यंदा दुप्पट दर
गत वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. तसेच द्राक्षशेती समोर दराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले होते. द्राक्षाला प्रति किलो ३० ते ४० रुपये प्रति किलो असा दर होता. हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत दरात सुधारणा झाली नव्हती. यंदा मात्र नैसर्गिक संकट ओढवले. उत्पादन घटले. परंतु गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्षाचे दर दुप्पट आहेत.
विभागनिहाय द्राक्ष विक्री हंगाम स्थिती
नाशिक ३० टक्के
सोलापूर ५ टक्के
सांगली २५ टक्के
पुणे २५
द्राक्षाचे दर (प्रति किलो)
पांढरी द्राक्ष ६० ते ९०
रंगीत द्राक्ष ८० ते १३०
मे अखेर चालणार हंगाम
दर वर्षी द्राक्ष विक्रीचा हंगाम मेअखेर पूर्ण होतो. यंदा पावसामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगाम लवकर संपेल अशी शक्यता होती. परंतु, अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे वेळापत्रक बदल करून छाटणी केली आहे. त्यामुळे द्राक्ष विक्रीचे नियोजन त्यानुसार होत आहे. यंदाही द्राक्ष विक्रीचा हंगाम मे महिन्याअखेर चालणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.