Dairy Business Management:
शेतकरी नियोजन । गोपालन
शेतकरी : कमलेश राजेंद्र शिंदे
गाव : पाणसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
शेती : आठ एकर
एकूण जनावरे : गाई ७, म्हशी २ व दोन कालवडी
नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील कमलेश राजेंद्र शिंदे यांनी बीएस्सीसी ॲग्रीचे शिक्षण घेत पशुपालन व्यवसाय सुरु केला आहे. पशुपालनात शिंदे कुटुंबाने नियोजनातून दुग्ध व्यवसायात यश मिळवले आहे. दुग्धव्यवसायात गाईंच्या आहार, आरोग्य व्यवस्थापनासह गोठ्यातील कामांचे काटेकोर नियोजन केले जाते.
कमलेश हे सध्या सोनई (ता. नेवासा) येथील कृषी महाविद्यालयात ‘बीएस्सी ॲग्री’ चे शिक्षण घेत आहेत. त्यांची आठ एकर शेती आहे. पूर्वी वडिलांचा दुग्ध व्यवसाय होता. मात्र काही कारणास्तव दुग्ध व्यवसाय कमी केला होता. अनेक वर्ष लहान कालवडी घेऊन त्यांचे संगोपन करून विक्री करण्याचा व्यवसाय केला. मागील तीन वर्षांपूर्वी कालवडींची विक्री न करता त्यांचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले.
त्यासाठी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. सध्या त्यांच्याकडे सात संकरित गाई, दोन देशी गाई, दोन म्हशी व दोन कालवडी आहेत. दर्जेदार खाद्य उपलब्ध करण्यासाठी घास, गिन्नी गवत, ऊस व मका लागवड केली आहे. दुग्ध व्यवसायात कमलेश यांना वडील राजेंद्र, आई अंजली यांची मदत मिळते. तसेच सुयोग बेहळे यांचेही मार्गदर्शन मिळते.
व्यवस्थापनातील बाबी
गाईंसाठी बंदिस्त आणि मुक्त संचार अशा दोन्ही पद्धतीच्या गोठ्याची उभारणी केली आहे. बंदिस्त गोठ्यामध्ये गाईंना खाद्य खाण्यासाठी गव्हाण तयार केल्या आहेत. त्यामुळे चाऱ्याची नासधूस कमी होण्यास मदत झाली आहे.
गोठ्यातील दैनंदिन कामांना पहाटे साडेपाच वाजता सुरवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला आणून बांधल्या जातात. मिल्किंग मशिनच्या मदतीने दूध काढणी केली जाते. दूध काढणी झाल्यावर गाईंना चारा व खुराक दिला जातो.
दररोज सकाळी एका गाईला साधारणपणे २० किलोपर्यंत कुट्टी केलेला चारा दिला जातो. त्यात प्रामुख्याने गिन्नी गवत, ऊस, मका आणि मुरघास यांचे प्रमाण साधारण असते. सकाळी द्यावयाची कुट्टी रात्रीच करून ठेवले जाते. मात्र दुपारच्या वेळी द्यावयाच्या चाऱ्याची रात्री कुट्टी केल्यास बुरशी लागत असल्याचे त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे घासाची कुट्टी न करता दुपारी गाईंना थेट घास खाद्य म्हणून दिला जातो.
दूध काढणी व चारा काढणीनंतर गाई दिवसभर मोकळ्या सोडल्या जातात. संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी, चारा व अन्य कामांसाठी गाई गोठ्यात आणून बांधल्या जातात. त्यानंतर सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.
दुभत्या गाईला दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी अडीच किलोपर्यंत पशुखाद्य दिले जाते. त्यात प्रामुख्याने गोळीपेंड, वालीस, सरकी पेंड, दूध वाढीसाठी बार्ली यांचा समावेश असतो.
मुक्तसंचार गोठ्यात गाईंना पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा हौद उभारला आहे.
खाद्य व्यवस्थापन
घरच्या आठ एकर शेतीपैकी तीन एकरांत ऊस लागवड केली आहे. तर उर्वरित क्षेत्रात जनावरांना दर्जेदार खाद्य उपलब्ध करण्यासाठी घास, गिन्नी गवत, चाऱ्यासाठी ऊस व मका लागवड केली आहे.
चारा टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी स्वतःच्या शेतात मक्याची लागवड केली जाते. उत्पादित मक्यापासून दरवर्षी ८ ते १२ टनांपर्यत मुरघास तयार केला जातो. त्यासाठी मक्याच्या सुधारित वाणाची पेरणी केला जाते. मुरघास निर्मितीमुळे टंचाईच्या काळात चारा टंचाईवर मात करणे शक्य होते.
दुभत्या गाईला दूध देण्याच्या क्षमतेनुसार खाद्य दिले जाते. दररोज सकाळी व संध्याकाळी अडीच किलोपर्यंत पशुखाद्य दिले जाते. त्यात प्रामुख्याने गोळीपेंड, वालीस, सरकी पेंड, दूध वाढीसाठी बार्ली यांचा समावेश असतो.
नवजात वासरांची काळजी
नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांचे स्वतंत्र संगोपन करण्यावर भर दिला जातो. जन्मानंतर नवजात वासरांना तीन महिन्यापर्यंत दूध पाजले जाते. सुरुवातीला दीड लिटरपर्यंत दूध पाजतात. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुधाचे प्रमाण कमी केले जाते. तीन महिन्यानंतर दूध पाजणे पूर्णतः थांबवून खाद्य खाण्याची सवय लावली जाते. वासरांच्या वयानुसार खाद्य, आहार दिला जातो. लहान वासरांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे वासरे, कालवडीच्या वाढीला मोठी मदत होते.
शेतामध्ये शेणखताचा वापर
कमलेश शिंदे यांनी सांगितले की, दरवर्षी गोठ्यातून ३० टनांपर्यत शेणखत उत्पादन मिळते. उत्पादित सर्व शेणखताचा घरच्या शेतीमध्ये वापर केला जातो. चारा पिकांच्या लागवडीत तसेच अन्य पिकांच्या लागवडीत शेणखताचा वापर करण्यावर भर दिला जातो. शेणखताच्या वापरामुळे शेती सुपीक होऊन उत्पादन चांगले मिळते आहे. मक्याचे उत्पादन घेताना शेणखताच्या वापरासह टोकण पद्धतीने लागवड, ठिबकचा वापर यामुळे उत्पादनात वाढ मिळविणे शक्य होत आहे. मक्याचे एकरी तीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. शेणखताच्या वापरामुळे दर्जेदार चारा उत्पादन तसेच पिकांचे उत्पादन वाढून सेंद्रिय कर्बही वाढला आहे.
आरोग्य व्यवस्थापन
जनावरांचे नियमितपणे लसीकरण करण्यावर भर दिला जातो. त्यात लम्पी, लाळ्या खुरकूत यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाते.
लम्पीचे वर्षातून एकदा लसीकरण केले जाते. लाळ्या-खुरकुताचे पुढील दोन महिन्यात लसीकरण केले जाईल. लसीकरणासाठी स्थानिक सरकारी पशुवैद्यकांची मदत व मार्गदर्शन घेतले जाते.
गाई व कालवडींना दर तीन महिन्यातून एकदा जंताच्या गोळ्या दिल्या जातात.
गोचीड निर्मूलनासाठी गोठ्यामध्ये योग्य उपाययोजना केल्या जातात. तसेच गाईंना गोचीड निर्मूलनासाठी लसीकरण केले जाते.
लोखंडासारखी वस्तू चुकून जनावरांच्या खाण्यामध्ये येऊन पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. असे प्रकार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. जेणेकरून संभाव्य नुकसान टाळले जाते.
- कमलेश शिंदे, ९५५२५२४०४२
(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.