Grape Management
Grape Management Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Management : अवकाळी पावसाचे बागेवरील परिणाम

Team Agrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर


गेल्या दोन दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही समजते. अशीच स्थिती पुढील चार ते पाच दिवस टिकण्याची अंदाज आहे.

हे लक्षात घेता ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे बागेत चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमान कमी होईल. वातावरणातील आर्द्रताही १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असेल. यामुळे वाढीच्या विविध अवस्थांत असलेल्या द्राक्ष बागांमध्ये (Grape vineyard) काही अडचणी येऊ शकतात.

१) मणी तडकण्याची समस्या ः
बऱ्याचशा बागेत फळकाढणीला उशीर असेल किंवा मण्यात नुकतेच पाणी उतरलेले असेल, अशा स्थितीत पाऊस थोडा जास्त प्रमाणात झालेला असल्यास मण्याचे क्रॅकिंग होऊ शकते. ज्या अवस्थेत बागेत आपण पाणी कमी करतो, त्या अवस्थेतच नेमका पाऊस झाला असल्यास वेलीला प्रमाणापेक्षा पाणी जास्त होऊ शकते.

त्याचा दाब मण्यांवर येण्याची शक्यता असते. त्यामुळे मणी तडकण्याची शक्यता वाढेल. फळकाढणीच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस झाला व नंतर उन्हे पडून वातावरण कोरडे होण्यास सुरुवात झाल्यास मणी तडकण्याची शक्यता कमी राहील.

वेलीवरील घडांमध्ये आधीच जर पाण्याचा दाब असल्यास वेलीने आधीच पुरेसे पाणी शोषून घेतलेले आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे फारसा विपरीत परिणाम होणार नाही.

-आपल्या बागेतील द्राक्षाच्या वाढीच्या अवस्थेचा विचार करता व ढगाळ वातावरण किंवा पुढील पावसाचा अंदाज घेऊन बागेत पाणी देण्याचे नियोजन करावे.


-मुख्यतः मण्याच्या सालीची लवचिकता व्यवस्थित असल्यास मणी तडकण्याची शक्यता कमी होते. यासाठी कायटोसॅनसारख्या घटकांचा वापर फायद्याचा ठरेल.

ढगाळ वातावरण असल्यास (पाऊस येण्यापूर्वी) याची फवारणी करावी. बागेत पुरेसे पाणी दिलेले असल्यास मणी क्रॅकिंगची समस्या काही प्रमाणात टाळता येईल.

२) गोडी कमी होणे (शुगर रिव्हर्सिंग) ः

फळ काढणीच्या काही दिवसाआधीपासून आपण पाण्यावर नियंत्रण ठेवतो किंवा बागेतील पाणी कमी करतो. काही परिस्थितीत बागेत पाणी पूर्ण बंद केले जाते.

यामागे मण्यांत लवकर साखर यावी, हा उद्देश असतो. वाढते तापमान, कमी किंवा बंद केलेले पाणी याचा परिणाम म्हणजे मण्यावर एक ताण बसतो. परिणामी साखरेचे प्रमाण वाढते.

बऱ्याच वेळा जास्त ताण बसल्यास मणी देठापासून मोकळेसुद्धा होतात. (सुकतात किंवा गळतात.) वेलीवर द्राक्ष घडांच्या जास्त संख्येमुळेही पाण्याचा जास्त बसल्यास मणी गळताना दिसतात.

दुसऱ्या परिस्थितीत जर बागेत काही दिवसांपूर्वी पाणी बंद केलेले असल्यामुळे वेलीमध्ये ताण बसतो. वेलीमध्ये असलेल्या प्रोलीन सारख्या घटकांमुळे तो ताण सहन करण्याची क्षमता वाढते.

अशा वेळी अचानक पाऊस झाला तर वेल जास्त प्रमाणात पाणी शोषून घेते व त्याचा मण्यावर दाब वाढतो. या परिस्थितीमुळे मण्यात गोडी कमी झाल्याचे अनुभवास येते. त्यालाच ‘शुगर डायलूट’ किंवा ‘शुगर रिव्हर्स’ झाली असे म्हणतात.

जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास काही दिवसांकरिता ही परिस्थिती बागेत दिसू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी बागेत पुन्हा पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असेल.

- बागेतील फळकाढणीला असलेला कालावधी विचारात घेता व बागेत किती पाऊस झाला यानुसार पाण्याचे नियोजन करावे. - सामान्यतः या वेळी आपण साखर पुन्हा वाढावी, यासाठी पूर्ण पाणी बंद करतो. मात्र असे न करता चार ते पाच दिवस थोड्या फार प्रमाणात पाणी सुरू ठेवावे.

म्हणजेच बागेत बोद व मुळांच्या कक्षेतील वातावरण पूर्ण कोरडे न राहता वाफसा स्थितीत राहील, याकडे लक्ष द्यावे. पाणी बंद करण्यापूर्वी बागेत जर रोज एक तास पाणी देत असल्यास हा पाऊस झाल्यानंतर १५ ते २० मिनिटे पाणी पुरेसे होईल.

जेणेकरून जमीन वाफसा स्थितीत राहील. तीन ते चार दिवसांनंतर हळूहळू पाणी कमी करता येईल. त्याचा गोडीवर विपरीत परिणामही होणार नाही. -बागेत पाणी सुरू असलेल्या परिस्थितीत पालाशची उपलब्धता नेहमीच्या मात्रेपेक्षा १० ते २० टक्क्यांने वाढवावी.

३) बेदाणा शेडमधील परिस्थिती ः

बेदाणा तयार होण्यासाठी एकतर द्राक्ष मण्यात गोडी वाढणे आवश्यक असते. बेदाणा सुकतेवेळी शेडमध्ये तापमान वाढून आर्द्रता कमी होणे आवश्यक असते. यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहणे गरजेचे असते.

ही परिस्थिती ज्या शेडमध्ये असते, तिथे चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असेल आणि आर्द्रताही वाढली असेल. बेदाणा सुकवत असलेल्या भागामध्ये जास्त पाऊस झाला असल्यास आणि ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिलेले असल्यास आर्द्रतेत वाढ होऊन वारे वाहणे थांबले असेल.

यामुळे बेदाणा तयार होण्यासाठी द्राक्ष मणी लवकर सुकणार नाहीत. तापमान कमी झाल्यामुळे बेदाणा एक सारख्या रंगाचा न होता काळा पडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. बऱ्याच वेळा बागायतदार पुन्हा मिथाईल ओलिएट (डिपिंग ऑइल) आणि पोटॅशिअम कार्बोनेटची एक फवारणी करण्याचा प्रयत्न करतात.

यामुळे मण्याच्या सालीला असलेली सूक्ष्म छिद्रे मोठी होऊन मण्यातील पाणी लवकर निघून जाण्यास मदत होते. मात्र या वेळी आर्द्रता वाढलेली असल्यामुळे व वारे नसल्यामुळे मण्यातून पाणी निघून जाणे कठीण होईल. परिणामी, बेदाणा काळा पडेल.

तेव्हा या स्थितीमध्ये पुन्हा फवारणी करणे टाळावे. -बेदाणा शेडच्या भोवती शेडनेट झाकलेले असल्यास ते मोकळे करून हवा खेळती राहील असे नियोजन करावे.

- पंख्याच्या साह्यानेही बेदाण्याच्या रॅकमधून वारे वाहते ठेवता येतील. असे दोन ते तीन पंख काही वेळासाठी सुरू ठेवावेत.

४) रिकटच्या बागेतील नियोजन

रिकट घेतल्यानंतर नवीन फूट जोमाने वाढण्यास सुरुवात झाली असेल. काही ठिकाणी वाढलेल्या तापमान, कमी पाणी व हलकी जमीन असे असलेल्या परिस्थितीत मात्र फुटींची वाढ थांबलेली असेल.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे जर वातावरणात १० टक्के आर्द्रता वाढलेली असल्यास त्याचे चांगले परिणाम फुटीच्या वाढीवर दिसून येतील. ही परिस्थिती बागेत एक आठवड्यापेक्षा जास्त राहणार नाही, हे लक्षात घ्यावे.

उपलब्ध परिस्थितीचा फायदा घेऊन बागेत नत्रयुक्त खतांचा वापर करावा. वेलीची वाढ करून घ्यावी.

-नुकत्याच निघालेल्या फुटीची वाढ सुरू असताना (चार ते बारा पानांची अवस्था) गारपीट झालेली असल्यास नवीन फुटीवर गारांचा मार बसला असेल.

अशा स्थितीमध्ये काही ठिकाणी वाढत असलेल्या नवीन फुटीही तुटल्या असतील, किंवा फुटींवर जखमा झालेल्या असतील. अशा स्थितीमध्ये जखमी व तुटलेल्या फुटीच्या एक डोळा खाली काप घ्यावा. त्याखालून येणाऱ्या फुटी वाढवून घ्याव्यात.

-काडीवर जास्त जखम झालेली असल्यास त्या जखमेच्या खाली किंवा निघालेल्या फुटीवर एक ते दोन डोळे राखून पुन्हा काप घ्यावा. तेथून नव्या फुटी वाढवून घ्याव्यात.

-काडीवर थोडीफार जखम झालेली असल्यास पुन्हा रिकटची गरज नसेल. अशा वेळी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची एक फवारणी करावी. नत्राचा वापर करून वाढ करून घ्यावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT