Maharashtra Assembly winter Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यात कुणाची टक्केवारी किती?

बाळासाहेब पाटील

Nagpur News : नागपूर राज्यात एक रुपयांच्या पीक विम्यावरून शेतकऱ्यांची फववणूक सुरू आहे. सहा हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्यांच्या घशात घातले जात आहेत. त्यामुळे यात कोणाची किती टक्केवारी आहे, ते जाहीर करा असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (ता.११) विधानसभेत सरकारला दिले.

तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत असून या संकटातून बळीराजाला बाहेर काढायचे असेल तर ४० दुष्काळी तालुक्यांप्रमाणे १०२१ महसुली मंडलांनाही लाभ द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत अल्पकालिन चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांच्यासह जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून हल्ला केला. दुष्काळ, पाणीटंचाई, वादळी पाऊस, गारपीट, पीक विमा कंपन्यांची मुजोरी, निर्यात बंदी, प्रस्तावित बोगस निविष्ठा कायदा आदींवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून पिकविम्याचे संरक्षण द्यावे, तसेच हेक्टरी ५० हजार, बागायती शेतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये मदतीचीही मागणी करण्यात आली.

विधानसभेत प्रश्नोतराचा तास संपल्यानंतर नियम १०१ अन्वये शेतीच्या प्रश्नांवर अल्पकालीन चर्चा पुकारण्यात आली. या चर्चेत विरोधकांतर्फे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांनी प्रस्ताव सादर केला. वडेट्टीवार यांनी पीक विम्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ते म्हणाले, ‘‘एक रुपयांच्या पीक विम्याचा गाजावाजा केला. पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले, कोण किती टक्क्यांचे वाटेकरी आहेत हे सरकारने जाहीर करावे. पैसे घेतल्याशिवाय पीक विमा अधिकारी बांधावर पाय ठेवत नाही. जर असेच घडणार असेल तर एक रुपयांसाठी पीकविमा का काढला, ८ हजार कोटी रुपये हप्त्यापोटी कंपन्यांना का दिले,

मराठवाड्यातील एकाच जिल्ह्यात पीक विमा का जातो, अन्य जिल्ह्यात का नाही, असे सवाल केला. शेतकऱ्यांना अग्रिम मिळाला नाही तर मी दिवाळी करणार नाही, असे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले होते. शेतकऱ्यांना मात्र अग्रिम मिळाला नाही, तरीही कृषिमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली, शेतकऱ्यांची दिवाळी काही झाली नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

जयंत पाटलांची जोरदार टीका

जयंत पाटील म्हणाले, ‘‘सरकारने अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. अनेक तालुके वगळले आहेत. सरकारने अजून आकडेवारी आलेली नाही. इथे आपला संसार फाटला आहे आणि तिकडे दुसऱ्याचा संसार कशाला सावरायला जाता.’’

भास्कर जाधव आक्रमक

यावेळी शिवसेनेच्या भास्कर जाधव यांना बोलू न दिल्याने ते आक्रमक झाले. हे पक्षाचे कार्यालय आहे की कुणाच्या घरचे सभागृहा आहे, असे म्हणत संताप व्यक्त केला. तर प्रकाश सोळंके यांनीही बोलण्याचा क्रम कसा निश्चित केला असे विचारत संतापाला वाट मोकळी करून दिली.

कांदा मेक इन इंडियात येत नाही का? : बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली. ‘‘मी सरकारला पाठिंबा दिला ही चूक झाली,’’ असे म्हणत भाषणांत त्यांनी असंसदीय शब्दांचा वापर केला. मात्र, तो पटलावरून काढून टाकण्यात आले. कडू म्हणाले, ‘‘कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याचे दर बाजारात वाढले म्हणून गळा काढता, मग मेक इन इंडियामध्ये कांदा का बसत नाही.

कांदा महाग झाला तर कुणी मरत नाही. मी सत्तेत आहे त्यामुळे बोलता येता येत नाही, पण माझ्या आईने सांगितले आहे, पक्षासोबत बेईमानी कर पण बापासोबत करू नको. त्यामुळे माझा बाप शेतकरी आहे, त्यामुळे मी बोलणारच,’’ अशा शब्दात संताप व्यक्त केला.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT