Sangli News : ‘कृष्णा खोरे’अंतर्गत आटपाडी तालुक्यात ओढ्यावर बांधलेले पाच नवीन आणि पाच जुने अशा दहाही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना एकच दरवाजा असल्याने मोठी गळती लागली आहे. यातील पाच बंधारे सहा महिन्यांपूर्वीचे आहेत. त्यामुळे बंधारे लगेच रिकामे होतात.
कृष्णा खोरे महामंडळांतर्गत ‘टेंभू’चा भाग म्हणून तालुक्यात माणगंगा नदीसह ओढ्यावर १५ कोल्हापूर बंधारे बांधले आहेत. दहा जुने, तर पाच नवीन आहेत. माण नदीवरील पाचही बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी दुहेरी दरवाजे आहेत. त्यामुळे पाण्याच्या दाबाने पहिल्या दरवाजातून गळती झालेले पाणी दुसऱ्या दरवाजात दाब कमी झाल्याने थांबते.
शिवाय दोन दरवाजांमध्ये माती टाकल्याने गळती होत नाही. मात्र, उर्वरित दहा बंधाऱ्यांना एकच दरवाजा आहे. हे बंधारे शेटफळे, गोमेवाडी, नेलकरंजी, दिघंची, अनुशे मळा, झरे, विठलापूर, आटपाडी शुकओढा, देशमुखवाडी येथे आहेत. यातील शेटफळे, अनुसेवाडी, देशमुखवाडी, दिघंची आणि झरे येथील पाच बंधारे नुकतेच बांधले आहेत.
‘टेंभू’अंतर्गत या बंधाऱ्याच्या पायाचे काम पंधरा वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर निधीअभावी काम अनेक वर्षे रखडले. अर्धवट बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी विशेष प्रयत्न करून ‘टेंभू’अंतर्गत रखडलेल्या बंधाऱ्यासाठी निधी आणला. गतवर्षी या बंधाऱ्याचे काम झाले. या नवीन बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी प्रत्येक गाळ्यात एकच लोखंडी दरवाजा आहे.
या दरवाजातून मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. संबंधित ठेकेदाराने बंधाऱ्यात पाणीसाठा करून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित केलेत. तसेच एक दरवाजा असलेले जुने पाच बंधारेही गळतात. या बंधाऱ्यांना सात ते दहा कप्पे असून प्रत्येक कप्प्याच्या दारातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते.
स्थानिक शेतकरी बारदाणा, प्लॅस्टिकची पोती आणि आणि जुन्या कपड्याचा वापर करून गळती थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अपेक्षित गळती रोखता येत नाही. सध्या ‘टेंभू’चे पाणी सोडले आहे. त्याने बंधारे भरून घेतलेत. मात्र गळती मोठी असल्याने अवघ्या दहा-पंधरा दिवसांत बंधारे पुन्हा कोरडे पडणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
दहा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना गळती लागल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्या आहेत. गळती थांबवण्यासाठी पोती आणि जुने कापडे टाकून थांबवण्याचा प्रयत्न केला होता. बंधाऱ्यांना सध्या एकच दरवाजा आहे. दोन दरवाजे बसवण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींनी मागणी केली तर तसे प्रस्ताव पाठवून दोन दरवाजे बसवण्यासाठी प्रयत्न करू.- महेश पाटील, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, आटपाडी
शेताजवळ बांधलेल्या नवीन कोल्हापूर बंधाऱ्याला मोठी गळती आहे. याची ‘पाटबंधारे’कडे तक्रार केली आहे. बंधाऱ्यात जास्त दिवस पाणीसाठा झाला तर ते जमिनीत मुरून विहिरींचा पाझर वाढणार आहे.- विपुल गायकवाड, शेतकरी, शेटफळे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.