Nagpur News: ‘माय जेऊ खालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही,’ अशी अवस्था नजीकच्या काळात बियाणे उद्योगाची झाली आहे. ‘एचटीबीटी’ला (कपाशीच्या तणनाशक सहनशील बीटी बियाणे) परवानगी मिळत नसल्याने राज्यात अनधिकृत बियाण्यांची तस्करी वाढली आहे. त्याचा फटका बियाणे उद्योगाला बसला असून यंदा कोट्यवधी रुपयांची उलाढाल प्रभावित झाली आहे.
‘एचटीबीटी’ची लागवड ५० टक्क्यांवर गेली असून यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीत वाढ होणार आहे. देशात सुमारे १३० लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. देशाची रुई उत्पादकता मात्र इतर देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. तंत्रज्ञानाचा अभाव हे कारण त्यामागे सातत्याने दिले जाते. यातूनच उठाव होत केंद्र सरकारने २००२ साली बीजी-१ आणि त्यानंतर २००६ मध्ये बीजी-२ तंत्रज्ञानाला मान्यता दिली.
तेव्हापासून आजवर देशात कापूस क्षेत्रात नवे कोणतेच तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. सध्या कापूस लागवड आणि व्यवस्थापनात तणाचे नियंत्रण हा कळीचा मुद्दा ठरतो. त्यासाठी अधिक मजूर लागतात आणि त्यांना मजुरी देखील चुकवावी लागते. परिणामी उत्पादकता खर्च वाढतो.
त्यावर उपाय म्हणून ‘एचटीबीटी’ बियाण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. हा प्रस्ताव जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीच्या मान्यतेअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. पर्यावरणीय धोका ओळखत केंद्र सरकारच याला मान्यता देण्यासाठी आग्रही नाही. त्यातूनच अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांचा बाजार विस्तारला आहे.
महाराष्ट्रात सुमारे ४० लाख तर विदर्भात सुमारे १५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. यासाठी १ कोटी १० लाख बियाणे पाकिटांची गरज भासते. परंतु अनधिकृत बियाण्यांच्या परिणामी अधिकृत आणि प्रमाणित बियाणे विक्रीचे प्रमाण ५० टक्केवर आले आहे. त्यामुळे बियाणे उद्योग आणि त्यावर अवलंबिता असलेल्या घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे.
कापसाखालील क्षेत्र मोठे असल्याने कृषी सेवा केंद्रधारक देखील कापूस बियाणे विक्री हंगामाच्या प्रतीक्षेत असतात. परंतु बाजारात अनधिकृत बियाणे आधीच पोहोचत त्याची लागवड होते. त्यामुळे त्यांचाही व्यवसाय प्रभावित झाला आहे.
तंत्रज्ञानासाठी आम्ही सकारात्मक आहोत. परंतु सध्या ‘एचटीबीटी’च्या नावाखाली अप्रमाणित बियाणे विक्री होत आहे. त्यात शेतकऱ्यांची फसगत होते. जोखीम कमी व्हावे याकरिता शेतकरी आंतरपीक घेतात. एकाच पिकावर अवलंबिता राहिल्यास शेती क्षेत्रातील जोखीम वाढेल, असाही धोका आहे.- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
अनधिकृत बियाण्यांसाठी कोणतीच नियमावली नाही. याउलट कायदेशीर मार्गाने बीजोत्पादनातून बियाणे बाजारात आणणाऱ्यांवर मात्र बंधने लादली जात आहेत. ‘एचटीबीटी’त फवारणीकामी असलेले तणनाशक स्वस्त असल्याने हे घडत आहे. त्यामुळे असे तणनाशक महाग करीत लागवडपूर्व व लागवडीनंतर तत्काळ वापरात असलेले तणनाशक सरकारने स्वस्त करावे. असे केले तरच अनधिकृत बाजाराला पायबंद बसेल.- शैलेंद्र दफ्तरी, संचालक, दफ्तरी सीड, सेलू, वर्धा
नियमात राहून काम करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण ४० ते ५० टक्के क्षेत्रावर लागवड अनधिकृत बियाण्याची लागवड होत आहे. ‘एचटीबीटी’आड काहीही विक्री होत असल्याने दरवर्षी ७० ते ८० टक्के शेतकरी यात फसतात. सोबतच अनेक कारणांमुळे कापसाखालील क्षेत्र कमी झाल्याने त्याचाही परिणाम बियाणे उद्योगावर झाला आहे.- समीर मुळे, अध्यक्ष, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सीयाम)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.