Barfi Business
Barfi Business Agrowon
ॲग्रो विशेष

Barfi Business : ‘बर्फी’तून अर्थकारण गोड करणारे ठिकपुर्ली गाव

Raj Chougule

Rural Development : कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकपुर्ली (ता. राधानगरी) हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव विशेष करून भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. गावाची (ता. राधानगरी) तीस वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागे.

पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या गावाला विहिरींचाच काय तो आधार होता. उसासारखे पीक घेणे शक्यच नव्हते.

कालव्‍याच्‍या पाण्‍याच्या साह्याने गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर वांगी, वरणा, दोडका, कोबी आदी भाजीपाला पिके घेऊन संसाराला हातभार लावणे सुरू केले. दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली.

थोडी स्थिरता येते आहे असे वाटताच १९९० च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्‍वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून अर्थार्जन वाढत आहे हे लक्षात येऊ लागले.

मग बाकी ग्रामस्थांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्यास सुरुवात केली. उद्योजकता वाढीस लागली. अलीकडील काही वर्षांत सुमधुर बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारे गाव अशी ठिकपुर्लीची ओळख तयार झाली आहे.

जुन्या कौलारू घरांच्या जागी नव्या टुमदार वास्तु उभ्या राहत आहेत. अंगणात उभ्या चारचाकी गाड्या घराचे वैभव अधोरेखित करीत आहेत.

...अशी होते बर्फी निर्मिती

गावच्या एकूण लोकसंख्येच्‍या सुमारे ८० टक्‍के कुटुंबांकडे एकपासून ते १० संख्येपर्यंत म्हशी आहेत.तर गावात बर्फी निर्मितीत सुमारे पंधरा व्‍यावसायिक आहेत. त्यांच्याकडून दररोज सुमारे १५०० लिटरपर्यंत दुधाची मागणी असते. तीन दशकांपासूनचे दुग्धोत्पादकांसोबत त्यांचे विश्‍वासाचे संबंध तयार झाले आहेत.

त्यामुळे दर्जेदार दुधाचा पुरवठा होतो. दूध संस्था ज्याप्रमाणे दर दहा दिवसांनी उत्पादकांना बिल देतात त्‍याच पद्धतीने हे व्यावसायिकही उत्‍पादकांना रक्कम देतात. डेअरीकडूनही दूध घेण्यात येते.

दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनविण्याच्या कामास सुरुवात होते. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. मोठ्या काहिलीत दहा लिटर दुधाचे आधण असते. गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्‍या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधण लागते. दीड ते दोन तासांतबर्फी तयार होते.ग्राहकांची पसंती

दररोज सुमारे ४०० किलो म्हणजे १३ ते १४ हजार बर्फी नगांची निर्मिती होते. निव्वळ खव्याची बर्फी म्हणून ठिकपुर्लीची बर्फी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील ग्राहकांच्याही पसंतीस उतरली आहे.

जिभेवर येताच त्याचा विशिष्ट स्वाद आणि खमंगपणा जाणवतो. सुरुवातीला काही किलोमध्ये विकल्या जाणाऱ्या बर्फीची आता दररोज एक लाख रुपयांपुढे उलाढाल होत असावी.

रोजगार निर्मिती झाली

कोल्हापूर जिल्‍ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यातील अनेक युवक नोकरी व्यवसायासाठी मुंबईकडे धाव घेतात. पण ठिकपुर्ली गाव त्याला अपवाद आहे. अन्य गावांच्या तुलनेचा येथील अनेक युवक दुग्‍ध व्‍यवसायात आहेत.

त्यातून स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन शहरांकडे होणारे स्थलांतर टळले आहे. विशेष म्हणजे काही व्यावसायिक नोकरदारही पशुपालन करत असल्‍याचे चित्र गावात पाहण्यास मिळते.

बर्फीचा गोडवा परदेशापर्यंत

कोल्हापूर गारगोटी मार्गावर गाव असल्याचाही फायदा होतो. गावालगतच्या शेळेवाडी तसेच परिसरातील दुकानदारांसह जिल्ह्यातील काही गावे, निपाणी परिसर आणि कोकणात विकण्यासाठी येथून बर्फी जाते. मुंबई पुण्यालाही बर्फी पाठविली जाते.

३६० रुपये प्रति किलो, तर १२ रुपये प्रति नग असा त्याचा दर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून परदेशात स्थायिक झालेले किंवा कामानिमित्त जाणारे ही बर्फी सोबत आवर्जून घेऊन जातात.

अनेक वर्षांपासून आम्‍ही दुग्‍ध व्यवसायात आहोत. रोज संकलित होणारे म्‍हशींचे सर्व दूध बर्फी व्यावसायिकांना देतो. त्यातून दर चांगला मिळतो. जनावरे व्‍यवस्थापनातील बहुतांश रक्कम त्यातून निघून जाते.
सागर शिंदे, दुग्धोत्पादक, ७८७५४१९५५५
उत्तम प्रतीचे दूध आणि साखरेशिवाय अन्य कोणते कृत्रीम पदार्थ बर्फी निर्मितीत वापरले जात नाहीत. कुठलीही भेसळ नसते. त्यामुळे आमच्या गावातील बर्फी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. पंधरा वर्षांपासून बर्फीनिर्मिती व्यवसायात आहे. अनेक शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करतो. गावातील दुधावर गावातच प्रक्रिया होते. चांगल्या दराने विक्रीही तिथेच होते. त्यामुळे दुग्ध उत्पादक आणि व्यावसायिक असा दोघांचाही नफा वाढतो. गावातील अनेक कुटुंबांचे अर्थकारण या व्यवसायातून उंचावले आहे
संदीप ढेंगे बर्फी व्यावसायिक ९७६३६४५८८४
दुग्ध व बर्फी व्यवसाय हा एकमेकांवर अवलंबून असलेले व्यवसाय आहेत. परिसरातील गावे व कोल्हापुरातील अनेक ठिकाणी ही बर्फी उपलब्ध झाली आहे ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
महादेव एकल, ग्रामस्थ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT