Akola News : अकोला जिल्ह्यात कपाशीच्या काही विशिष्ट वाणांची मागणी होत असल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती बनलेली आहे. बीजोत्पादनावर झालेल्या परिणामामुळे यंदा संबंधित कंपनीने गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे लाखावर पाकिटांचा कमी पुरवठा केला. त्यामुळे बियाण्याच्या टंचाईत आणखी भर पडली. या हंगामासाठी नियोजित केलेला पुरवठा कंपनीमार्फत झाला असून बाजारपेठेतून बियाण्यांची उपलब्धता आटोपत आली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांची मागणी कायम असल्याने बियाण्यांसाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत.
यंदाच्या हंगामासाठी १६ मे पासून बीटी कपाशी बियाणे विक्रीला सुरुवात होताच पहिल्याच दिवसापासून या वाणांसाठी कृषी केंद्रांसमोर रांगा लागायला सुरुवात झाली. ही परिस्थिती दिवसेंदिवस कृषी विभागाच्या हाताबाहेर गेली. शेतकऱ्यांची मागणी वाढलेली असताना बियाणे पुरवठा कमी करण्यात आला.
किमान गेल्या हंगामात संबंधित कंपनीने केलेला २ लाख ६० हजार पाकिटांचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या कंपनीने १ लाख २३ हजार ७४० पाकिटांचे नियोजन कृषी खात्याला कळवले. यासाठी मागील वर्षी बियाणे उत्पादन क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती, मजुराचा आभाव त्यामुळे बियाणे उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.
उत्पादित बियाणे हे कॉलिटी कंट्रोल विभागाच्या रिपोर्टनुसार मार्केटला उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे त्या रिपोर्टनुसार बियाणे हे कधी कमी-जास्त प्रमाणात उपलब्ध होत असते त्याला अनुसरून वितरकांना बियाणे पुरवठा करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण कंपनीच्या अधिकाऱ्याने दिले.
तरीही शेतकऱ्यांची मागणी व कृषी खात्याने टाकलेल्या दबावामुळे कंपनीने नियोजित १ लाख २३ हजार ७४० पाकिटांऐवजी हा पुरवठा एक लाख ५२ हजार पाकिटांपर्यंत कसाबसा नेला. मात्र, अद्याप या बियाण्यांसाठीच्या रांगा कायम आहेत. अकोला हा कापूस उत्पादक जिल्हा असून खारपाण पट्ट्यात या वाणाची मोठी मागणी असते. यामुळे कपाशी बियाण्यांची विक्री सुरू होताच शेतकऱ्यांच्या उड्या पडू लागल्या. जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही गर्दी केली. दररोज ही गर्दी वाढत आहे.
काळाबाजार फोफावला
हंगामाच्या सुरुवातीलाच बियाणे उपलब्धतेवरून उडालेला गोंधळ शमलेला नाही. या परिस्थितीचा काही जणांनी चांगला गैरफायदाही उचलला. या वाणांचे पाकिटे किमतीपेक्षा जादा दराने सर्रास विक्री झाल्याची ओरड होत आहे. शिवाय काही विक्रेत्यांनी लिकिंगचाही प्रकार केला. ही सर्व परिस्थिती कृषी खात्याच्या हाताबाहेर गेली. दररोज लागलेल्या रांगा व गोंधळाने कृषी खात्याची हतबलताही स्पष्ट केली. एवढ्या साऱ्या गोंधळात कुठेही कारवाई झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.